Wednesday, January 12, 2011

ठाणेकरांनो, चिरडून मरा..!

मी ठाणेकर आहे, खाली व्यक्त केलेला उद्वेग दररोज चेंगरणार्या, धडपडणार्या हजारो ठाणेकरांसारखाच माझाही आहे. वाईट एवढेच कीएवढ्या-तेवढ्या कारणावरून फुटेज खायला धावणारे, लोकलअडवायला धावणारे लोकप्रतिनिधी ठाण्यातून ये-जा करणार्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या या दररोजच्या यातायातीकडे पहायला तयार नाहीत...होऊ नये ते घडले की मात्र या सगळ्यांना पाझर फुटेल आणिचॅनेलच्या कॅमेर्यांसमोर तोंड फुटेस्तोवर यांची बडबड सुरू होईल. तेव्हा दुर्दैवी शेळी जिवानिशी गेलेली असेल... असे होऊ नये एवढ्यासाठीच हे लिहिलंय...


ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन, तीन-चार आणि पाच-सहावर उतरणा-या सीएसटीच्या दिशेकडील प्रवासी जिन्यावर तुम्ही कधी पाय ठेवला आहात?, त्या अरुंद जिन्यांवरील चेंगराचेंगरीतून, घुसमटीतून कसेबसे बाहेर पडून मोकळा श्वास घेतला आहात? ही थरारक कामगिरी फत्ते करणारे तुम्ही एकमेव नाही, दररोज हजारो ठाणेकर ही जीवघेणी कसोटी देत असतात. गेली अनेक वर्षे सकाळ-दुपार-संध्याकाळ अगदी तिन्ही त्रिकाळ हे अरुंद जिने प्रवाशांची घुसमट करत आहेत, तिथे चेंगराचेंगरी दररोजची आहे. अद्याप यापैकी कुठल्याही जिन्यावर काहीही दुर्घटना घडलेली नाही हे केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याचे संकेत आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना कधीचेच दैवाच्या हवाली केले आहे. इथली दररोजची परिस्थिती पाहिली तर, ‘चिरडून मरा..’ अशीच ठाणेकर प्रवाशांची अवहेलना मध्य रेल्वेने चालवली असल्याचे जाणवते.
 
जिथे ठाण्यातून निवडून आलेल्या आमदार-खासदारांनाच ठाणेकरांच्या या दररोजच्या यातायातीचे काही पडलेले नाही, तिथे मध्य रेल्वेने त्यांना वा-यावर सोडले तर नवल काय? हे अरुंद जिने आणि वरचा पादचारी पूल इथे एकदम दोन गाड्या आल्यावर जी काही अभूतपूर्व गर्दी होते, चेंगराचेंगरी होते त्यात दररोज किती विनयभंग होतात, नकोसे स्पर्श होतात, चिमटे काढले जातात, पर्स-पाकिटे उडवली जातात याचेही या लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही. काही महिन्यांपूर्वी याबाबत फारच ओरड झाल्यावर होमगार्ड्स वगैरे ठेवून गर्दीचे नियंत्रण करण्याचे नाटक काही दिवस चालले होते. ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक, नेहमीच आग्रही मतांच्या पताका फडकवणारे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, राजन विचारे, एकनाथ शिंदे, बऱ्याचदा ठाणे रेल्वे स्थानकाचा राऊंड घेणारे खासदार आनंद परांजपे या लोकप्रतिनिधींपैकी कुणीही अद्याप तरी मध्य रेल्वेला प्रवाशांच्या या हालअपेष्टांसाठी धारेवर धरलेले नाही. नाही म्हणायला खासदार संजीव नाईक यांनी या समस्येसाठी रेल्वेशी पत्रव्यवहार केल्याचा दावा केला होता. मध्य रेल्वेनेही तीन-चार, पाच-सहा फलाटांवर उतरणारे आणखी दोन जिने करण्यासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती.

प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही, मध्य रेल्वे आणि लोकप्रतिनिधी थंड, सुस्त आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात तीच चेंगराचेंगरी, तीच नकोशी घुसमट, तोच असह्य प्रवास नव्या वर्षातही सुरू आहे. या जिन्यावरून कसेबसे बाहेर पडणारे प्रवासी मात्र आजचा दिवस तरी वाचलो.., म्हणत थकलाभागला जीव पुढे ओढत जात आहेत.

No comments:

Post a Comment