Showing posts with label पुस्तकांविषयी. Show all posts
Showing posts with label पुस्तकांविषयी. Show all posts

Thursday, February 3, 2011

फ्लेमिंगो पाहिलेला माणूस


फ्लेमिंगो पाहायला किती कष्ट पडतात ते माडगूळकर त्यांच्या `वाघाच्या मागावर' पुस्तकातील एका लेखात सांगतात... मुंबईला कंटाळून ते पुण्याला गेले होते. ब्याऐंशी सालची गोष्ट. त्यांचे पस्नेही प्रकाश गोळे, जस्टिस पटवर्धन अशी सारी मंडळी राजस्थानला पाणथळ आणि पक्ष्यांची बिऱहाडं पाहायला निघाले होते. सांभर तलावाजवळचा प्रसंग त्यांनी लेखात दिलाय... तलावाजवळ पोहोचेपर्यंत अंधार झाला होता, हजारो, लाखो पाखरं असावीत एवढं फक्त जाणवत होतं. दुसऱया दिवशी सकाळी ही मंडळी गेली तर खरोखरीच हजारोंनी अग्निपंखी नजरेसमोर होते. पण मधला चिखल, गाळ यामुळं अनेक हात दूर. माडगूळकरांनी कुतुहलानं आजूबाजूला चौकशी केली - पण, या पाखरांची अंडी, पिल्लं असं कुणाला कुठं दिसलं नव्हतं. हे सांगितल्यावर माडगूळकरांनी लेस्ली ब्राऊन या लेखकानं त्याच्या `एन्काऊंटर्स वुईथ नेचर' या आपल्या पुस्तकात फ्लेमिंगोवर काय लिहिलंय ते दिलंय, लेस्ली म्हणतो - त्याने आजवर अभ्यासलेल्या कोणाही प्राण्यानं वा पक्ष्यानं मला फ्लेमिंगो इतकं कष्ट आणि दुःख दिलेले नाही. लेसर फ्लेमिंगो (खालच्या मजकूरात प्रारंभी दिलेले छायाचित्र) कुठं पिल्लं घालतात हे शोधण्यासाठी त्याने दहा वर्षं घालवली. आफ्रिकेतील नॅट्रोन सरोवराभोवती तो मुक्काम ठोकून असायचा.
माडगूळकर राजस्थानात एवढं हिंडले, त्यावर सुंदर पुस्तक लिहायचं, त्यात त्यांनीच चितारलेली चित्रं, स्केचेस असं टाकून सजवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण, पुण्यात आल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं, एक चांगलं पुस्तक त्यांच्या मनातच राहिलं, काळाच्या ओघात विरून गेलं, अशी खंत त्यांनी प्रकट केली आहे.
माडगूळकरांना फ्लेमिंगोंसाठी राजस्थान गाठलं होतं. जर त्यांनी मुंबई सोडली नसती तर या निसर्गवेडय़ा लेखकाला इथल्या शिवडीच्या दलदलीत, फार तर उरण खाडीपट्टय़ात फ्लेमिंगो पाहायला मिळाले असते, असं मला आता फार वाटतंय.
जाता जाता - राजस्थानला आम्ही गेलो होतो ते केवळ भरतपूरसाठी. योगायोगाने डॉ. सलीम अलींना सायकल रिक्षातून फिरवणाऱया नंबर वन सायकल रिक्षातच बसून दिवसभर पक्षी ऐकले, पाहिले, तृप्त झालो. 2001मध्ये फ्लेमिंगो तर मी ठाण्यात अगदी माझ्या घराच्या अंगणात म्हणावे इतके जवळून पाहिले होते. 2001मध्ये ठाण्यात कोपरीतील मिठागर परिसरात आमची सोसायटी उभी राहिली, कंम्पाउंड वॉल तयार व्हायचीच होती, सर्पकुळ त्यांची वहिवाट सोडायला तयार नव्हतं, समोर तेव्हा मीठ उत्पादन होत होतं, पावसाळ्यात मीठासाठी तयार केलेली खाचरं, तळी भरून जायची आणि फ्लेमिंगोंसह कितीतरी पाहुणे पक्षी आमच्या समोर मुक्कामाला यायचे. अक्षरशः काही हातांवरून मी तेव्हा लागोपाठ दोन वर्षे गुलाबी गळा-मानेचे फ्लेमिंगो पाहिले होते. नंतरच्या वर्षी ते जरा दूर गेले आणि आताशा येतच नाहीत. आता त्यांचं तळंही कुठं राहिलयं म्हणा....

Tuesday, February 1, 2011

पुन्हा प्रेमात (व्यंकटेश माडगूळकरांच्या)

पुन्हा प्रेमात असं मी मुद्दाम म्हणतोय!
पण माझं प्रेमात पडणं जरा वेगळ्या वाटेवरचं आहे. ही नोंद वाचलीत तर तुम्हाला त्याचा नीटच उलगडा होत जाईल. म्हणजे बघा - व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील असे अस्सल मातीतलं लिहिणारे लेखक अलीकडे लायब्ररीत पुस्तकरुपात समोर आले तरी ते उचलले जात नाहीत. त्यांच्या लिखाणातील मज्जा, खुमारी अनेकांना माहितीच नसते, अनुभवलेली नसते. काहीजणांच्या बाबतीत जरा वेगळं असतं, त्यांनी आधीच या लेखकांच्या पुस्तकाचा फडशा पाडलेला असतो, ही सगळी आदरणीय लेखकमंडळी मनात अढळपदावर विराजमान असली तरी वाचनाला नवीन दिशा मिळत राहिल्याने, आणखी वेगळे, नवीन लेखक समोर आल्यामुळे ही मंडळी जरा बाजूला पडतात. या जुन्याजाणत्यांची मोहिनी कायम असली, गाभुळलेल्या चिंचेची चव कशी नाव निघताच जिभेवर उमटते तसंच या मान्यवरांच्या नावासरशी मनात सय जागी होत असली तरी यांनी काही नवीन लिहिलयं वा त्यांच्या पुस्तकांचं पुनर्मुद्रण झालंय याचा मागोवा घ्यायचं राहून गेलेलं असत... 

माझं तसंच काहीसं झालं होतं. या फर्मास मंडळींपासून मीच जरा दूर गेलोय, काही दिवसांपूर्वी द.मा. कथाकथनासाठी माझ्या गावात, माझ्या भागात, कोपरीत ठाण्यात येऊन गेले. त्यांच्या कार्यक्रमाचा फलक वाचला तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणवलं. अरे ही गप्पीष्ट, गोष्टीवेल्हाळ माणसं, त्यांची पुस्तकं आपण एकदम बाजूला केल्यासारखी केली त्यात नुकसान आपलंच झालंय. मनाचा एक कोपरा कपारीसारखा, दगडासारखा घट्ट झालाय, निष्ठुर झालायं..
एरव्हीही मी पुस्तकांसाठी हावरा आहे. पण, विशाखानं, माझ्या बहिणीनं 'वाघाच्या मागावर' हे माडगूळकरांचं पुस्तक मला दाखवलं तेव्हा तर मी एकदम हललोच. तगमग झाली माझी. माडगूळकर माझे आवडते लेखक, शिकारकथा आवडीचा सा साहित्यप्रकार आणि हे पुस्तकचं मी विसरून गेलो होतो. त्यातील काही लेख मी आधीच वाचले असले तरी पुस्तक पुन्हा प्रसिद्ध झाल्याचं मला कळलंच नव्हतं. शिकारकथा, जंगल,  रानवाटांविषयी आत्मीयतेने लिहिणारी मराठीत तरी दोन-तीनच. माडगूळकर, चितमपल्ली, लालू दुर्वे असे मोजकेच. तर, एकदाचं हे पुस्तक माझ्या हातात आलंय आणि ३१ जानेवारीच्या मध्यरात्री मी बैठक मारून सुरूही केलंय...
 असं बर्याचदा होतं, एखादी आवडती गोष्ट दीर्घ काळानंतर अवचित समोर येते आणि आपण पुन्हा प्रेमात पडतो, वेडे होतो. पुस्तकांच्या, लेखकांच्या बाबतीत माझं असं नेहमीच होत असंतं. आणि माडगूळकरांची ती सहजशैली, गोष्ट सांगितल्यागत प्रवाही लिहिणं तसंच आहे, पुन्हा त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडावं असं... तुम्हीही एकदा अनुभव घ्या! 

संकल्पात आणखी भर - काही वर्षांपूर्वी माझे चिंतेचे दिवस, टेन्शनयात्रा याच मंडळींमुळे सुसह्य झाली होती. आता पुन्हा एकदा याच मंडळींची सोबत होणार आहे.