Thursday, June 16, 2011

पोलिस यंत्रणेमुळेच जे. डेंचा बळी

...गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, ही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेली नेहमीची पोपटपंची आणि ‘..जे. डे यांच्या मारेक-यांना पकडले जाईल इतकेच नव्हे तर त्यांच्या हत्येचा कट रचणा-यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल’, हे मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांचे वक्तव्य, या सगळ्याला आता पाच दिवस उलटून गेलेत. पोलिसांनी जारी केलेली मारेक-यांची रेखाचित्रे वगळता अन्य कुठलाही धागादोरा त्यांच्या हाती लागलेला नाही. तपास थांबल्यागत झालाय. थांबलेले नाहीत ते फक्त जेंच्या आईच्या, बहिणीच्या आणि पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू. आता तर डे यांच्या हत्येमागे पोलिस अधिकारीच असल्याचे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.
  पोलिसांवरंच प्रेशर वाढत चाललं तसं कुणातरी तिघांना पकडून हजर केलं गेलं. आणि लगेच रात्री सोडूनही दिलं. पोलिस या करामती नेहमीचकरत असतात. पण यामुळे पोलिस या हत्येबाबत मारेकर्यांचा शोध घ्यायला खरोखरीच कितपत सीरीयस आहेत हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तेल तस्करी, टोळीयुद्ध, मटका, रिअल इस्टेटकडे नजर वळलेल्या बडय़ा डॉन मंडळींची मोठमोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांतील भागीदारी आणि एसआरएतील गुंतवणूक, खंडणीखोर गुंड, मुंबईवर राज्य करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये सतत सुरू असलेली चढाओढ, परदेशातील गुंडांच्या संपर्कात, पे रोलवर असणारे भ्रष्ट पोलिस अधिकारी, गुंडपुंडांचे आश्रयदाते राजकारणी यांच्यातील साटेलोटे.. या सगळ्याबद्दल जे बिनधास्त लिहायचा, त्याचं नेटवर्क जबरदस्त होतं, पोलिस खात्यात, अंडरवर्ल्डमध्ये, खब-यांच्या दुनियेत त्याला माहिती उपलब्ध व्हायची. त्याच्या या तपशीलवार पर्दाफाशमुळे पोलिसांना कारवाई करणे, हातपाय हलवणे भाग पडायचे. त्याच्या या लिखाणामुळे अनेकांची मोठी हानी झाली होती, अनेकांच्या काळ्या कारवाया उजेडात आल्या होत्या. त्यात गुंड होते, टोळ्या पोसणारे राजकारणी होते, तेल तस्कर होते आणि दुखावले गेलेले काही भ्रष्ट पोलिस अधिकारीही होते. अनेकांच्या मागावर असलेला जे आणखी काही धक्कादायक भांडाफोड करण्याच्या तयारीत होता. यापैकी कुणीतरी त्याला मार्गातून दूर केला असण्याची शक्यता आहे.

या सर्वापेक्षा जे डेंच्या हत्येला जबाबदार आहे, ती निष्क्रिय पोलिस यंत्रणा. डिझेल माफिया, मटका किंग, खंडणीखोर गुंड, परदेशात लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या सांगण्यानुसार इथे कुणावरही बंदूक रोखणारे, जीव घेणारे छोटे-मोठे शूटर, गुंडांना पोसणारे बिल्डर यापैकी कुणावरही कठोर कारवाई न करणाऱ्या मुंबई पोलिसांना जणू त्यांच्या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे. एकेकाळी अवघ्या अंडरवर्ल्डला जरब बसवणारे मुंबई पोलिस अवसान गळाल्यागत थंड पडले आहेत, हेच नेमके जेला खूपत होते. मुंबईला ग्रासणारा हा कॅन्सर पोलिसांना दिसत कसा नाही? या त्वेषात त्याने अनेक गोष्टी उघड केल्या, गुंडांना आणि त्यांना पाठीशी घालणा-या भ्रष्ट अधिका-यांना उघडे पाडले, त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले, बातम्या दिल्या. मुंबई शांत आहे, कुठे काय भानगडी सुरू आहेत.. अशा अविर्भावात डोळे मिटून बसलेल्या पोलिसांना त्याच्या तपशीलवार, पुराव्यानिशी दिलेल्या बातम्यांमुळे कारवाई करणे भाग पडले होते. त्याच्या या लिखाणामुळे तेलमाफियांचे प्रचंड नुकसान झाले होते, रियल इस्टेटमध्ये जम बसवू पाहणा-या अनेकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले होते. या सगळ्यांना तो काटय़ासारखा सलू लागला होता. साम, दाम यापैकी कशालाही जे भीक घालत नसल्यामुळे त्याची लेखणी कायमची थांबवणे हाच एक पर्याय या मंडळींसमोर होता. यामुळेच जे मारला गेला. पत्रकार, छायाचित्रकारांवर लाठय़ाकाठय़ा चालवणाऱ्या मुंबई पोलिसांनी आधीच गुंडपुंडांना जरब बसवली असती, संघटित गुन्हेगारीचा, खंडणीखोर टोळ्यांचा बिमोड केला असता, तर जेला या भ्रष्ट यंत्रणेला इतके भिडायची गरज पडली नसती, त्याचा जीव तरी वाचला असता..
 पत्रकारांनी लिहायचे आणि मगच पोलिसांनी हलायचे, असे दिवस आले असतील तर कठीण आहे. भ्रष्ट पोलिस, स्वार्थी राजकारणी आणि गुंड टोळ्यांचा ऑक्टोपस मुंबई कणाकणाने गिळतो आहे. छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्यांतील आरोपींपासून अगदी संघटित टोळ्यांपर्यंत कुणावरही कारवाई करण्याची इच्छाशक्ती न दाखवणारी निष्क्रिय पोलिस यंत्रणा याचीच पुष्टी देत आहे. पोलिस आणि राजकारण्यांपर्यंत सगळेच भ्रष्ट आहेत, असा सरसकट शेरा मारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसले तरी हे खरे असावे, असे वाटण्याइतकी जखम चिघळली आहे. आणि ‘विरुद्ध’ चित्रपटात अमिताभने साकारलेल्या असहाय्य बापासारखाच सर्वसामान्य मुंबईकरांचा चेहरा केविलवाणा दिसू लागला आहे.

No comments:

Post a Comment