Monday, June 20, 2011

थेंबांचे इवलाले मोती तळहातावर झेलून घ्यावे...


पावसाबद्दल प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूरने लिहिलंय -
बहकीसी बारीशने फिर
यादोंकी गठरी खुलवायी
मीलें चन्द लम्हें घायल
और ढेर सारी रुसवाई...
आणि त्याच्याच एका कवितेत तो म्हणतोय -
झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे...
गुरू लिहितो अगदी आपल्या मनातलं सांगितल्यासारखं पण, तुम्ही खरं सांगा पायाला चाकं लावलेल्या तुम्हा-आम्हा मुंबईकरांना वेळ आहे का हो असं कुणाच्या आठवणींनी घनव्याकूळ व्हायला? सिमेंटच्या जंगलात सरसर उतरणाऱया पाऊसथेंबांचं स्वागत करायला क्षणभर थांबायला? `थांबला तो संपला' ही उक्ती मुंबईच्या पावसात `थांबला तो भिजला' अशी बदलते हे प्रत्येक मुंबईकरासाठी स्वानुभवाचे बोल आहेत. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर नव्हे खड्डय़ांत साचलेल्या चिखलपाण्याच्या पिचकारीने ज्याला वा जिला शर्ट, स्कर्ट, पाटलोण, साडी अशा कुठल्याही वस्त्रावर हुसैनी डिझाइन चितारून घ्यायचंय त्याने असं मध्येच पावसासाठी थांबण्याची हिंमत करावी. मुरब्बी मुंबईकर कुठेच थांबत नाही. सोसाटय़ाचा वारा आणि तुफान पावसाला कसाबसा इवल्याशा छत्रीने सामोरा जाता जाता तो ओलाचिंब झालेला असतोच. पावसाला भेटायला तो थांबला नाही तरी पाऊस त्याला येऊन कडकडून भेटतोच. घाटात, गडकिल्ल्यांकडे जाणाऱया अनवट रानवाटांवर भेटणारा झिम्माड, तुफान, बेफाम, आडवातिडवा झोडपणारा पाऊस याच सगळ्या रूपांमध्ये इथल्या इथे मुंबईतही आपली गाठभेट घेतो. खऱया मुंबईकराला हे माहिती असतं.  
यामुळेच, अडलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, लोकलमधील रखडपट्टी, फलाटांवरची अफाट गर्दी, दुकानांच्या पत्र्यांवरून ओघळणाऱया पागोळ्यांचा अभिषेक, रस्ता, खड्डे व्यापून चारीठाव वाहणारे चिखलपाणी कशाकशाने मुंबईकरांची पावले थांबत नाहीत, अडखळत नाहीत. नेमेची येणाऱया पावसाबरोबर ठरलेल्या अडचणीही दरवर्षी येणारच हे सर्वसामान्य मुंबईकरांनी आता गृहितच धरलंय. यामुळेच कितीही लटकंती झाली तरीही रस्त्याकडेला लागलेल्या गाडीवरील गरमागरम भजी आणि आलं घातलेली झकास कडक कटिंग चाय त्याला क्षणार्धात फ्रेश करते अन् मुंबई मस्त पाऊस अंगावर घेत चालत राहते!
छायाचित्रे - अतुल मळेकर, संदेश घोसाळकर

No comments:

Post a Comment