Tuesday, March 8, 2011

ठाणेकर रेल्वेचे नावडते

हे जे काही लिहिले होते ते रेलवे बजेट आधी लिहिले होते. आमच्या ठाण्यातील खासदारानी काहीतरी करणार म्हटले होते म्हणून. आता बजेट मंजूर होताना ठाण्याच्या पदरात काहीही पडलेले नाहीं... ठाणेकरांचे दुर्दैव दुसरे काय!
----------------------------
आमची लटकंती कायमच राहिली
बिच्चारे ठाणेकर गहिवरलेत हो..
कधी कधी ना आपल्याला अगदी भरून येतं, गहिवरून येतं..
 ठाणेकरांच्या आणि विशेषत: ठाणेकर रेल्वे प्रवाशांच्या नशिबात हा सुखद योग लिहिला असावा, याची मला आता खात्री पटलीय. रेल्वे बजेट येत्या शुक्रवारी मांडले जाईल, अनेक नव्या घोषणा होतील, नव्या गाड्या सुरू होतील, जुन्या गाडय़ांच्या फे-या वाढतील, फलाट सुधारणा, रेल्वे स्थानक सुधारणा कार्यक्रम जाहीर होतील, आधीच्या कार्यक्रमांना नवा मुलामा दिला जाईल.. उपनगरी रेल्वे सुधारणांविषयीही थोडेसे बोलले जाईल, इवलुशी तरतूद केली जाईल..
 या बजेटच्या पूर्वसंध्येला ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक, ठाणेकर खासदार आनंद परांजपे यांनी ‘ठाण्याला ज्या काही वर्ल्ड क्लास सुविधा देण्यात येणार होत्या, त्याचे काय?’ असा प्रश्न उपस्थित केलाय. ठाण्याशी संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधींपैकी किमान दोघांनी ठाण्याविषयी इतकं कळकळीनं बोलावं यापरते दुसरे सुखावह अधिक काय असणार?
 बरं वाटतं हो, फलाटांच्या अरुंद जिन्यांवरून, चिंचोळ्या फूटओव्हर ब्रिजवरून धक्के खात, गर्दीत घुसमटत कसंबसं बाहेर पडू पाहणा-या सर्वसामान्य जिवांना असं काही वाचल्यावर. दोघेही खासदार ठाण्याचं काय ते बोला?, असं रेल्वेमंत्र्यांना ठणकावून विचारणार असल्याचं वाचल्यापासून दररोजच्या गर्दीने, असह्य चेंगराचेंगरीने कातावलेल्या ठाणेकरांना एकदम गार वा-याची झुळूक घामेजल्या अंगावर यावी तसंच काहीसं वाटायला लागलंय.
 सदोदीत ठाणेकरांच्या कल्याणासाठी धावून येणा-या खासदारांच्या या जागृत जनसेवेबद्दलही आक्षेप घेणारे, नाकं मुरडणारे आहेतच. ‘आता जाग आली का या मंडळींना, गेल्या वर्षभरात ठाणे रेल्वे स्थानकाच्या कायापालटासाठी सल्लागार नेमण्यासाठी साधी सुचनाही निघाली नाही, प्रत्यक्ष सुविधांचे तर बाजूलाच राहिलं, त्याबद्दल काय केलं वर्षभरात, केवळ फलाटांवर फेरफटका मारून वा प्रवाशांशी संवाद साधून अडचणी दूर होत नाहीत..’ लोकाचं हे असं असतं, जरा संधी मिळाली की नुसती टीकाच. टीकाच करायची झाली तर लोक काय एक ना अनेक बाजूंनी बोलतात हो, पण आपले खासदार आता आवाज उठवणार आहेत, हे महत्त्वाचं. आमची विनंती एकच आहे- ते वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक, ठाणे स्टेशनचा कायापालट वगैरे जरा लांबलं तरी हरकत नाही, पण तेवढं ठाण्याच्या फलाटांवर नवे जिने होतील, रेल्वे पादचारी पुलांवरील घुसमट कमी होईल एवढं तरी यंदा जमवून आणा. बाकी व्हायला पुढचं बजेट आलं तरी हरकत नाही मग!

Thursday, March 3, 2011

`ऑनर किलिंग' अर्थात ऐकत नाही तर खलास करा लेकीला


हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ वगैरे आठवला तर खानदानकी इज्जत... सारखे डायलॉग लगेच आठवतात. मजा वाटायची नायकाचा किंवा नायिकेचा बाप असं बडबडायचा तेव्हा... असे चित्रपट पाहून-पाहून माहित असायचं की काही झालं तरी पडद्यावर बागबगिच्यात गाणीबिणी म्हणत हुंदडणारे ते घोडनवरे आणि घोडनवऱया शेवटी बोहल्यावर चढणारच आहेत, त्यांच्यापैकी कुणाचाही बाप आडवा आला तरी ते अटळ आहे. पण, या डायलॉगमागे एक वास्तव दडलंय एवढं कळण्याइतकी समज आली नव्हती तेव्हा हे चित्रपट पाहायचो, थिएटरमध्ये, टीव्हीवर. नंतर चित्रपटसृष्टी बदलत गेली आणि मीही. पण, रुपेरी पडद्यावर जे काही दाखवलं जातं त्यात वास्तवाचा अंश असा ना तसा, या ना त्या प्रकारे असतोच असतो, बऱयाचदा ते वास्तवाचंच पाहणाऱयाच्या नजरेला, बुद्धीला झेपेलसं प्रतिबिंब असतं, हे मात्र लगेच्याच काही वर्षात उमजलं होतं.
खानदानकी इज्जत... असतेच असते, प्रत्यक्षात आपल्याच रक्ता-मांसाच्या मुलीला गळा घोटून, विहिरीत ढकलून, विष देऊन, गळफास देऊन मारण्याइतकी ती विखारी असते हे मात्र गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं कळून आलंय. उत्तर प्रदेश, हरयाणा इथलीच उदाहरणं वाचायला मिळायची तेव्हा `ऑनर किलिंग' कसलं भयानक प्रकरण आहे, असं वाटायचं. आता थेट महाराष्ट्रात, नव्हे आपल्या मुंबईजवळ मुरबाडला गेल्या आठवडय़ात हेच घडलं. आंतरजातीय प्रेमसंबधांमुळे घरच्यानीच एका तरूण जोडप्याला संपवून टाकलं. दोन दिवसांपूर्वी मुंबईत याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. घरच्यांच्या विरोधामुळे जातीबाहेरच्या मुलाबरोबर पळून जाणाऱया पूजाला तिच्या भावानेच मारहाण करत, शिव्याशाप देत पनवेल फास्ट लोकलमधून वाशी खाडीपुलावर ढकलून दिले. आयुष्याची दोरी बळकट म्हणून पूजा वाचलीय, पण तिच्या डोक्याला, चेहऱयाला जबर मार बसलाय, जबडा निखळलाय. सध्या ती बोलू शकत नाही आणि ती तोल जाऊन पडली म्हणून सांगणाऱया तिच्या भावाला पोलिसांनी अपघात म्हणून नोंद करून सोडून दिलाय.

`टाइम'च्या वेबसाइटवर अमेरिकेतील एका ऑनर किलिंगबद्दल लेख प्रकाशित झालाय. (http://www.time.com/time/nation/article/0,8599,2055445,00.html?xid=newsletter-weekly) नूर-अल-मलेकी या इराकी मुलीबद्दल. ती जीन्स घालते, इकडे-तिकडे फिरते, इराकी मुलाबरोबर लग्न कर म्हटलं तर ऐकत नाही, थोडक्यात खानदानकी इज्जत साफ धुळीला मिळवतेय, म्हणून तिच्या बापाने नूरच्या अंगावर जीप घालून तिला 2009मध्ये अरिझोनाच्या एका वाहनतळावर चिरडून मारलं. फलेह-अल-मलेकी हे त्याचं नाव. अभ्यासात हुशार, सुंदर अशा नूरला अमेरिकन स्व-तंत्रवादी जीवनशैलीनं आकर्षून घेतलं होतं. तिला पाहिजे त्या प्रमाणे ती जगत होती आणि फलेहला ते आवडत नव्हतं.
नूर-अल-मलेकी
यामुळेच त्याने नूरला 17 वर्षांची असताना इराकला नेऊन तिचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं होतं. अवघ्या वर्षभरात नूर परत आली आणि वेगळी रहायला लागली. फलेहचं तेव्हापासून मस्तक फिरलं होतं. नूरनं घराण्याचं नाव बरबाद केलं असं मनात घेतलेल्या फलेहने अखेर एक दिवस तिचा काटा काढलाच. मला तिला मारायचं नव्हतं, तिच्या अंगावर थुंकायचं होतं, पण गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला, असं त्याचं म्हणणं अर्थातच कोर्टानं मानलं नाही. धक्कादायक हे की, `अशी मुलगी असेल तर काय करणार बाप, नूरने हे ओढवून घेतलं, तिला नीट वागायला काय झालं होतं, फलेहने केलं ते काही गैर नाही...' अशा प्रतिक्रिया अमेरिकेत स्थायिक झालेल्या इराकी समाजातून उमटल्या आहेत.
काहीही व्यक्त होण्यापलिकडलं हे भीषण वास्तव आहे.
मी माझ्या लेकीकडे पाहतोय... `मुली बापांच्या लाडक्या असतात' या सप्रमाण सिद्ध उक्तीला मी अपवाद नाही याची पुरेपूर जाणीव असलेल्या माझ्या लेकीनं आताच मला गुंडाळून ठेवलंय. पण, लेकींना कायम पाठीशी घालणारे माझ्यासारखे बाप आणि `मुलगी ऐकत नाही, खलास करा तिला', अशा हीन पातळीला उतरणारे बाप नावाचे राक्षस यांपैकी या राक्षसांची संख्या वाढू लागलीय की काय, या शंकेने मी भयकातर झालोय!
ज्या लेकीला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं, तिलाच खलास करायचं, दुसऱया घरची मुलगी सून म्हणून आणायची आणि तिला पेटवून द्यायचं, तिचा कोळसा करायचा असं करू शकणार्र्या राक्षसांचं अवतीभवती असणंही नकोसं झालंय!

Friday, February 18, 2011

मोदींचा गुजरात

मोदींना गुजरात  दंगलींबाबत कितीही हाणलं तरी नवा गुजरातही तेच घडवत आहेत हे नाकारता येणार नाही. ग्रंथालीच्या 'रुची'मध्ये त्यांच्या या प्रयत्नांविषयी माणिक मुंढे यांचा लेख प्रसिद्ध झालाय. मोदींचा हा चेहरा आणि त्यांचे प्रयत्न जाणून घ्यायचे असतील तर ही माहिती घेणेही आवश्यक आहे. जे आपल्याकडे अपवादानेच घडतंय किंबहुना नाहीच ते गुजरातमध्ये घडतंय... आपण काय करतोय?
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0Bx1wEkTwhB_aMjBlMzgwNzEtMmRmOC00MzVkLThhNDAtNWRjM2UxYjBkY2Zj&hl=en

Thursday, February 17, 2011

पिंपातले जगणे आहे आपले

वयाची चाळीशी वगैरे गाठली ना की बर्याचजणांना एक सिनिकपणाचा फील यायला लागतो. आजवरच्या वाटचालीत आपण फार म्हणजेफारच बरे-वाइट सॉसलेय, कसले कसले विदारक अनुभव गाठीशी जमा झालेत, असे काय काय वाटायला लागलेले असते... खूप पाहिलय,भोगलंय, चटके सोसलेत, हादरे मिळालेत असं सारं वाटायला लागतं... मी त्यातलाच एक होतो- (आता नाही )
वर्ल्ड प्रेस फोटोचे यंदाचे विजेते फोटो त्यांच्या साईटवर जाऊन पाहिलेत ना का हे सारे समज-गैरसमज आपोआप गळून पडतात. आपले कसलेहादरे आणि कसले जीवनाभुव. खरोखरीच पिंपातले जगणे आहे आपले एवढे मात्र कळते - सिनिकपणाचा आपला फील नष्ट व्हायला आणिमनाच्या गाभ्यापर्यंत तळ ढवळून काढणारा भूकंप काय असतो याचा थेट अनुभव घेण्यासाठी तरी या साइटवरील फोटो पहा. हा फोटो केवळ वानगीदाखलआहे. नवर्याच्या घरी नांदत नाही, पळून आली म्हणून नाक-कान कापलेल्या बीबी आयशा  या अफगाण युवतीचा... संवेदनशील असाल तरसमूळ उन्मळून पडाल असे बरेच फोटो या साईटवर आहेत.

 
World Press Photo of the Year 2010
Jodi Bieber, South Africa, Institute for Artist Management/Goodman Gallery for Time magazine

Bibi Aisha, an 18-year-old woman from Oruzgan province in Afghanistan, who fled back to her family home from her husband’s house, complaining of violent treatment. The Taliban arrived one night, demanding Bibi be handed over to face justice. After a Taliban commander pronounced his verdict, Bibi’s brother-in-law held her down and her husband sliced off her ears and then cut off her nose. Bibi was abandoned, but later rescued by aid workers and the American military. After time in a women’s refuge in Kabul, she was taken to America, where she received counseling and reconstructive surgery. Bibi Aisha now lives in the US.
 http://www.worldpressphoto.org/?bandwidth=high
 http://www.worldpressphoto.org/index.php?option=com_photogallery&task=view&id=2055&Itemid=292&bandwidth=high


Sunday, February 13, 2011

हेच तर खरं प्रेम असतं!

व्हॅलण्टाइन डेच्या निमित्ताने जिकडे-तिकडे लिहून येणार्या त्याच त्या सरधोपट गोड गोड प्रेमळ मुरंब्याएवजी प्रेमाविषयीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न प्रहारच्या 'रविवार विशेष' मध्ये आम्ही केला. त्या पानावरील तीन तर्हांचा मजकूर इथे देतोय... प्रेमात पडलेल्या, प्रेमात असलेल्या, प्रेमात पडत असलेल्या , काय करावं याबद्दल साशंक असलेल्या अशा सगळ्यांनाच हॅप्पी व्हॅलण्टाइन डे!
--------------------------------


र्गात तिच्या नकळत तिला पाहण्यासाठी केलेल्या मानेच्या कसरती, ती पहिली नजरभेट, वह्यांची-नोट्सची देवाणघेवाण, तिच्यासाठी वा त्याच्यासाठी तासन् तास ताटकळणं, काहीही न सांगता परस्परांना उमजलेलं फक्त दोघांचंच कोवळं गुपित, ती अवघ्या देहाची थरथर, जिवाची तगमग, सहज झाल्यागत वाटणा-या स्पर्शामुळे मनावर फिरलेलं मोरपीस, तिचं हसणं, त्याचं बोलणं, कधी तरी दुस-याच कुणाबरोबर दिसल्यावर काळजात खुपसली गेलेली विश्वासघाताची सुरी, ब्रेक-अपनंतर ओघाने येणारी उदासी, विमनस्कता, फकिरी अवतार, दाढीचे वाढलेले खुंट, अवचित भरून येणारे तिचे-त्याचे डोळे, एक ना अनेक हज्जार उपद्व्याप.. काय काय घडत असतं प्रेमात पडल्यावर त्याच्या आणि तिच्या भावविश्वात.. एक वेगळीच हुरहुर लावणाऱ्या नवथर वयातील या प्रेमाचे रंग, अनुभवांचे गंध प्रत्येकासाठी खास त्याचे असतात. खरंच असं होतं का हो? असं विचारून आणि त्यांनी सांगूनही हे सारं समजण्यापलीकडलं आहे. परस्परांमध्ये रमलेल्या या मंडळींना खरं तर उद्याच्या ‘व्हॅलंटाइन डे’चीही मातब्बरी नाही. त्यांच्यात सुंदर असं काहीतरी आधीच उमललं आहे, फुललं आहे. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी परस्परांमध्ये गुंतण्याचा आणखी एक बहाणा आहे.. त्यांचा प्रवास आता तर कुठे सुरू झालाय..
 
तसं पाहिलं तर, प्रेम म्हणजे ती आणि तो यांच्यातील त्यांच्यापुरता बंध. कधी हा बंध हळुवार, अलवार असतो आणि कधी कधी तन-मन घायाळ करणारा दुखरा, विषारी, घातकी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणाराही असतो. आपलं माणूस आपलं असल्याचा विश्वास आणि तसं असल्याचा आभास यात खूप अंतर असतं. जेव्हा या विश्वासाची चौकट विस्कटते तेव्हा हाच बंध रुतू लागतो, जीवघेणा ठरतो, दंश करतो, हे सगळं आपण अवतीभवती घडणा-या घडामोडींमधून पाहतोच. प्रेम म्हणजे केवळ दैहिक, लैंगिक आकर्षण, अंगभर फणा काढून उभी राहिलेली, तटतटून आलेली वासनेची अनावर नागीण म्हणायचं का?, असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना जेव्हा समाजात घडत असतात तेव्हा ‘व्हॅलंटाइन डे’भोवतीच्या गुलाबाच्या पाकळ्या आपोआप गळून पडतात.
 
पण, प्रेमासारख्या सुंदर भावनेला आपण फक्त ‘व्हॅलंटाइन डे’च्या कुंपणात का म्हणून अडकवायचं? या कुंपणापलीकडे प्रेमभावनेचे असंख्य आविष्कार आहेत. कुठलेही विकार नसलेली निखळ मैत्री आहे, स्नेह आहे, आपुलकी आहे, निर्मळ सदिच्छा आहेत, आस्था आहे.. या सगळ्यांचं काय? प्रेमात पडल्यापासून सुरू झालेल्या प्रवासात जेव्हा प्रेमभावनेची ही सगळी रुपं उमजायला लागतात तेव्हा परिपक्वतेच्या दिशेने त्या व्यक्तीची पावलं पडायला लागलेली असतात. परस्परांमधील प्रेमही या इथवरच्या प्रवासात मुरलेलं असतं आणि इतर नात्यांमधील पदर जाणवायला लागतात.
 
मुरलेलं प्रेम कशा-कशातून व्यक्त होतं बघा.. प्रेमाचा वसंत ऋतू सुरू असतो तेव्हा तिचं किंवा त्याचं काही म्हणजे काही खुपत नाही, आक्षेपार्ह, हास्यास्पद, विचित्र वाटत नाही. लग्न झाल्यावर नव्हाळीचे दिवस संपतात, संसाराचे चटके बसायला लागतात. तेव्हाही प्रेम असतं, परस्परांच्या सवयी, वर्तनविशेषही तेच असतात. पण, आता समीकरणं बदललेली असतात, नव्या जबाबदाऱ्यांमुळे आलेल्या मर्यादा, बंधनं जाचक वाटायला लागतात. इथेच ठिणगी पडते, लग्नाआधी काहीही वावगं न वाटलेल्या सवयी, वागणं फारच खुपायला लागतं. कारणं काहीही असोत, सुटलेल्या शाब्दिक बाणांनी विद्ध आपल्याच माणसाला केलं जातं, घायाळ मनांवर हळुवार फुंकर घालावीशी वाटू नये इतकी कटुता परस्परसंबंधांमध्ये निर्माण होते. तोपर्यंत प्रेमात परिपक्वतेची गोडी मुरली असेल तरच हे अवघड वळण सोपं होतं, तडजोड केली जाते, जोडीदाराशी जुळवून घेतलं जातं. ही तडजोड करणं, जुळवून घेणं, खटकणाऱ्या, डोकं सटकवणाऱ्या सवयींकडे समंजसपणानं दुर्लक्ष करणं, दिवसभराच्या रहाटगाडग्यानं थकल्या-भागल्या जोडीदाराला जवळ घेणं हेही प्रेमच, इथवरच्या प्रवासातील साऱ्या खाचखळग्यांतून खऱ्या अर्थानं तावूनसुलाखून निघालेलं प्रेम.
 याच प्रेमाचा आणखी एक उत्कट आविष्कार म्हणजे परस्परांवरील अथांग विश्वास. याच विश्वासाच्या बळावर परस्परांना पर्सनल स्पेस देता येते, गैरसमजांची वादळं भिरकावून देता येतात.. परस्परांच्या आश्वासक सोबतीने इथवर टाकलेली पावलं हेच तर खरं प्रेम असतं!
- शैलेंद्र शिर्के

बोल ना रे! आठवतंय का?

 














पूर्वी तिनं ‘क्लू’ दिला की, मी चुकत-माकत का होईना, उत्तरापर्यंत तरी पोहोचायचो. पण, नोकरीला लागल्यापासनं अशा गोष्टी आठवायला हल्ली मेंदूवर बराच जोर द्यावा लागतो. तेवढा वेळच मिळत नाही. म्हणून आता गोंधळ आणि वैताग दोन्हीही मनातल्या मनातच दाबून ठेवले. उगीच तेवढय़ावरनं माझी शाळा घ्यायची नाहीतर ही! तसं व्हॅलंटाइन डे भारतात साजरा करण्यामागचं लॉजिक आपल्याला तेव्हा अजिबात पटत नव्हतं. दोस्तांतदेखील मी माझं मत ठामपणे मांडायचो. पण तिच्यासमोर एकदाच
चुकून हे बोललो होतो. ‘आता शेती करायला तुम्ही बैलांऐवजी ट्रॅक्टर वापरता ना. तरीही, बैलपोळ्याला पुरणपोळी खातोस की नाही? तसाच व्हॅलंटाइनपण साजरा करायचा..’ आमच्या मातोश्रींनी हिला एकदा बेंदुराला जेवायला बोलावलं होतं. तीच आठवण तिनं उदाहरणासाठी वापरली असावी, मला बैल म्हणण्यासाठी नाही?! पण माझ्याबाबतच्या तिच्या टोमण्यांबद्दल असा संशयाचा फायदा घेऊन इज्जतीचा कचरा करून न घेतल्याचं समाधान मिळवणं रोज-रोज शक्य नाही व्हायचं.
 आजही तोच बाका प्रसंग उद्भवला होता. तिच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? घोर विवंचनेत सापडल्यासारखं झालं. ‘बोल ना रे ! आठवतंय का?’ आवाजात असा एकाच वेळी लडीवाळपणा आणि धमकावणी, अशा परस्परविरोधी गोष्टींचं संतुलन तीच साधू शकते. जातिवंत स्टेज आर्टिस्ट. एकदम जयश्री गडकर की दुस-या क्षणाला दुर्गा खोटे. ‘ हो.. अगदी व्यवस्थित आठवतंय. ते लीप इयर होतं..’ माझा ‘पीजे’ तिनं नाकाच्या शेंडय़ानंच उडवून लावला. पण एरवीसारखा माझी रेवडी उडवायचा तिचा मूड नव्हता. कारण तिनं थेट मुद्दय़ालाच हात घातला. ‘काय घेतलंयस माझ्यासाठी?’ गिफ्ट तिच्यासमोर धरलं.
सेकंदसुद्धा न दवडता तिनं कव्हर काढलं. मी आणलेला ड्रेस तिनं निरखला, खूश झाली. आपण आनंदलो आहोत, हे ती कधी बोलून नाही दाखवत. पण अशा वेळी एरवी पीचच्या फळासारखे दिसणारे गोबरट गोरे-तांबूस गाल पिकण्याच्या वाटेवर असलेल्या स्ट्रॉबेरीप्रमाणं हळूहळू लाल होऊ लागतात. अस्फुट स्मित ओठांवर उमटतं. गालावरचा तीळ काही सेकंदांकरता खळीत जाऊन विसावतो. या तिन्ही क्रिया जेव्हा एकाच वेळी होतात, तेव्हा मॅडम तुफान खूश झाल्यात, हे लक्षात येतं.
 
आता तिच्याकडून गिफ्ट घेण्याची पाळी माझी होती. तिनं हातात एकापाठोपाठ एक असे बोर्नव्हिटाचे तीन मोठे डबे टेकवले नि माझा चेहरा न्याहाळण्यास सुरुवात केली. तसाही तो तिचा आवडता छंदच आहे. ‘पाहतोस काय असा डब्यांकडं? त्यापेक्षा स्वत:कडे पाहा. नोकरी सुरू केल्यापासनं केवढा वाळलायस. आता तुझी हाडंसुद्धा कातडीला हाड हाड करत असतील. जरा जिवाला खात-पीत जा.’ हाताच्या दोन्ही मुठी डोक्याशी नेत काडकन बोटं मोडून तिनं माझी दृष्ट उतरवली. टॉप-जीन्सवाली पोरगी असं काय करतेय, या उत्सुकतेनं आजूबाजूच्या भोचक नजरा आमच्याकडे वळल्या. पण, तिची ही नेहमीची सवय आहे.
 
माझ्या नोकरीला ती स्वत:ची सवत समजते. ही नोकरी मी का करू नये, याची किमान एकशे पंधरा कारणं पटवून देणं, हा तिचा आवडता छंद. एरवी रोज भेटणारे आम्ही आता आठवडय़ातून एकदाच एकमेकांना पाहू शकायचो, हे तिच्या माझ्या नोकरीवरच्या रागाचं मुख्य कारण आहे. ‘जन्मल्यानंतर तू पंधरा दिवस डोळे उघडले नव्हतेस. आंधळेपणाचा हा वारसा तू अजून चालवतो आहेस, हे तुझ्या नोकरीवरून सिद्ध होतं. आणि असं माझंच नाही, हे भावी सासूबाईंचंही म्हणणं आहे.’ ‘तूही ज्या ब्रह्ममुहूर्तावर जन्माला आलीस, तेव्हा दगडूशेठ गणपतीवर कुणीतरी शेण फेकलं होतं आणि पुण्यात दंगल झाली होती. हे मी नाही, माझ्या भावी सासूबाई सांगतात.’
 
आता पुढचं सारं ऐकून घेण्यासाठी मी मनाला तयार केलं. कारण, व्हॅलंटाइन डे हा प्रेमाचा वार्षिक ताळेबंद मांडण्याचा दिवस असतो, अशी तिची धारणा आहे. त्यामुळं ती दारुगोळा डोक्यात भरूनच येते. हल्ली असंच होतं. नोकरी करता-करता दिवस कसा उडून जातो, समजतच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं राबणं. सकाळी थोडी सवड असते, तेव्हा तिची मेडिकलची लेक्चर्स असतात. दुपारी जेवायला येतेस का, हे विचारण्यासाठी फोन करावा, तर तिची नाटकाची प्रॅक्टिस असते. त्यानंतर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासायचे असतात. तिथून पुढं ती मोकळी होते, तेव्हा माझा दिवस पॅक झालेला असतो. हॅलेचा धूमकेतू ७६ वर्षानी पाहायला मिळतो ना, तसंच आमच्याही भेटीगाठींचं होतं. मग, दोघांच्याही सवडीप्रमाणं ‘फोन अ फ्रेंड’ करत समाधान मानायचं. 
तिचा त्रागा ऐकून आपण पृथ्वीऐवजी प्लुटोवर राहायला असतो, तर बरं झालं असतं, असं वाटतं कधीमधी. आपला एक दिवस तिथं साडेसहा दिवसांचा असतो म्हणे. ‘होईल सगळं व्यवस्थित..’, तिची पाठ थोपटत आश्वस्त केलं. मिनिटभर आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेलो. ‘सुंदर दिसतेयस.. सुरुवातीलाच द्यायची होती कॉम्प्लिमेंट. पण आता संधी मिळाली. ‘परत बोल..’ स्वत:चं कौतुक तिला दुस-यांदा ऐकायचं होतं. ‘लय भारी.. जगात भारी..’ शब्दांची कंजुषी करायला आपल्याला नाही जमत. ती हसली. तुफान गोड हसली. गालावर बक्षीस टेकवून बाजूला होताना कुजबुजली, ‘पुढल्या वेळी भेटू तेव्हा कामातनं वेळ काढून शेव्हिंग करून ये. पैसे नसतील, तर तेही खिशात ठेवलेत.’
- अजिंक्य गुंजाळ

आय हेट लव्हस्टोरी

तुझ्या आठवणीचं एक पान उलगडताना..
मीच विचारलं तिला..
Hi dear! कशी आहेस?

का कुणा ठाऊक

आज बोलावंसं वाटतंय..

सध्या तू कुठे आहेस

मला नाही ठाऊक

फिर भी दोस्त जिंदगी खुबसुरत है

नशिबानं पाठ फिरवली

पण जगलो ना तुझ्या आठवणीत

असो. का कुणास ठाऊक

आज काहीतरी मागावंसं वाटतंय तुझ्याकडून..

आयुष्याची संध्याकाळ सुरू झालीय

म्हणूनच लाडके एक गोष्ट मागतोय,

देशील का?

तुला आठवत असतील त्या कॅम्पसमधल्या पाय-या
आपण बसायचो त्याच त्या..

पाठीमागे काळाकुट्ट दरवाजा

बंद कायमचा

जणू काही आपल्या आधारासाठी

वर्षानुर्वष उभा द्वारपालासारखा.

पायाखालून जाणारी सुरावटीसारखी 

मुग्यांची रेष संथपणे सरकणारी 

आपल्या भोवतालचा तो हिरवा दरवळ

लाडके आजही माझ्या डोळय़ात साठवून राहिलेला 

अन् तुझ्या डोळय़ात 

दाटून राहिलेले माझं प्रेम.
लाडके, ते प्रेम मला परत देशील का?
आजही तुला आठवत असेल 

पार्कातला तो रस्ता.. 

हिरव्या कागदावरची एक 

वेडीवाकडी निळी रेषा 

तोच रस्ता तुझ्या पदस्पर्शाने सुखावलेला 

कडेवरच्या धुळीत तुझ्या-माझ्या पावलांचे ठसे 

लगट करणारे.. 

एकमेकांत मिसळणारे.. 

आजही हृदयात न पुसली गेलेली ती 

आपल्या प्रेमाची पायवाट.. 

लाडके तेच.. तेच प्रेम 

मला परत देशील का? 

आज आहे मी एकाकी 

आयुष्याच्या अखेरच्या 

पुलावरून चालतोय.. 

तुझ्या आठवणी सोबत घेऊन.. 

सगळे पाश मला 

कधीच सोडून गेलेत.. 

आता होईल हे शरीर मातीचं वारूळ.. 

मला लावायचंय त्यासमोर एक रोपटं 

तुझ्या आठवणींचं..

म्हणून तर मागतोय.. 

पुन: पुन्हा विनवतोय..

किती तरी दिवस उलटलेत..
कितीतरी महिने पसार झालेत..
तिची आठवण काढताक्षणी 

कुणीतरी हजारो सुया 

टोचतोय माझ्या अंगाला 

दात विचकून पुन: पुन्हा 

मी मात्र तिच्या गोड संवेदना 

पुन: पुन्हा झेलतोय.. 

एखादी पावसाची सर 

अंगावर घ्यावी तशी 

पण कधी संपणार हा वर्तमान काळ.. 

परमेश्वरा तू खरंच आहेस का? 

का सुटलाय मनाला कंप? 

कुठल्या वादळाची ही चाहूल आहे?
तिच्या आठवणीचं  
शेवटचं पान उलटताना.. 
भरदिवसा हा चंद्र कुठून आला? 

नियती मी तुला विचारतोय..? 

ती.. ती येणार आहे काय? 

तिचा गंध मला जाणवतोय.. 

वेदनेची चादर मी भिरकावून दिलीय.. 

त्या क्षणी ती म्हणाली.. 

Hi dear! कसा आहेस? 

इतक्या वर्षानी? 

म्हटलं लाडके खूप उशीर झालाय.. 

म्हणाली म्हणूनच मी आलेय. 

तुला मुक्त करायला.. 

फुंकर मारून तिनं विझवून टाकला 

माझा वर्तमान काळ 

आणि डांबून टाकलं 

भुतकाळाच्या काळय़ाकुट्ट कोठडीत 

डोळे उघडे असोत वा बंद 

दिसतेय फक्त तीच.. 

एकदा विचारलं तिला 

म्हटलं, का केलंस असं? 

म्हणाली संपलंय तुझं आयुष्य 

वर्तमानातली तुझी थरथर 

मला नाही पाहवणार 

तुझं कणाकणानं मरणं.. 

मी नाही सहन करणार.. 

त्यापेक्षा तू भूतकाळातच पडून राहा शांत.. 

मी वळवळतो.. किंचाळतो.. 

का..? का मला ही शिक्षा? 

असं काय पाप केलं मी..? 

म्हणाली, विचार तुझ्या मनाला 

विचार तुझ्या आत्म्याला.. 

आठव तो आपला कॅम्पस, 

तो स्पर्श हळुवार.. आठवतोय?
आठवतोय.. माझ्या मनाचा दरवळणारा गंध? 
म्हणूनच आज गडद संध्याकाळी

मी आलेय तुझ्याकडे..
युवर टाइम इज ओव्हर!
तीच म्हणाली, 

पुन्हा
चल निघायची तयारी कर
ठिकाय.. तू म्हणतेस तर.. 

गुंडाळतो माझा वर्तमान काळ.. 

मी तरी दुसरं काय करणार 

त्यावेळी तुझी प्रत्येक इच्छा.. 

तुझा प्रत्येक शब्द

माझं कर्म होतं 

अन् आता विरोध कशासाठी? 

पण एक विचारू का? 

तुझा इतका जीव होता माझ्यावर 

तर का चिनून घेतलंस माझ्यात? 

का गाढून घेतलंस माझ्या मेंदूत?
मग.. मग.. आज इतक्या वर्षानी का केलंस बंड..?
 माझं शरीर तुला कब्रस्थान वाटलं की काय
 असो.. दोष तुझा एकटीचा नाहीच 
मीसुद्धा केलं होतं ते पाप तुझ्यात एकरूप होण्याचं..
अन् तू गेलीस!नियतीनं ओढून नेलं तुला..
 काळाने फसवलं मला.. 
मग मीच करून घेतला माझ्या मनाचा नरक
 नंतर मीच खोदला खड्डा माझ्या हृदयात खोलवर.. 
गाढून टाकलं कायमचं तुला अन्
आता नाही पाहवत तुला माझं कणकणनं मरणं.. 
येस.. मी तयार आहे लाडके पण दारावर गिधाडं का फडफडतायत? 
मुर्खानो जरा धीर धरा..मीच येतोय बाहेर.. 
तुमचं खाद्य तुमच्याकडेच येतंय स्वत:च्या पायाने चालत..
 पण एक अट आहे हवं तर शेवटची इच्छा म्हणा 
हृदयावर नका हो चोच मारू
ती शांत झोपलीय.. 
गिधाडांनो एवढं कराल ना माझ्यासाठी
प्लीज इतकं कराच..!
                                         - सागर किनारे

 

Tuesday, February 8, 2011

14 फेब्रुवारी... नो पेट्रोल, ओन्ली लव्ह!


पाकिस्तानात पेट्रोल 17 रुपये लिटर
मलेशियात 17 रुपये लिटर
आणि आपल्याकडे... आज 63 असेल तर उद्या ते 65, 66 किंवा 70 रुपये लिटरही होऊ शकतं...
आपल्याकडेच हे असं कसं? जागतिक तेल बाजारपेठेतील वाढत्या किंमतींचा परिणाम फक्त भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर होतो आणि इतरत्र नाही, हे कसं काय?
सगळीकडून महागाईचे विळखे पडत असताना आपण, सर्वसामान्यांनीच संघटीत होऊन आवाज उठवण्याची, संघटीतपणे काहीतरी कृती करून नफेखोरांची नाकेबंदी करण्याची गरज आहे... चला, 14 फेब्रुवारीला फक्त प्रेमाची, स्नेहभावाची, ममत्वाची देवाण-घेवाण करू, या दिवशी पेट्रोल अजिबात घ्यायचे नाही, खरेदीच करायचे नाही, एक दिवस पेट्रोल खरेदीवर बहिष्कार टाकूया...
माझ्या एका जागरुक मित्राने पाठवलेल्या इ-मेलचा हा आशय आहे. आता पाकिस्तानात वा मलेशियात पेट्रोलचे भाव खरोखरीच किती आहेत याची खातरजमा लगे हाथ करणे जरा किचकट आहे. पण, पेट्रोलच्या दरवाढीने आपल्या खिशाला फार म्हणजे फारच झळ पोहोचतेय हेही खरं आहे. तेल कंपन्यांना सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्यापासून फक्त दरवाढच सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेव्हापासून तेलाच्या दरांत चढउतार झालीच नाही की काय? मग भाव कमी झाल्याचे कसे काय या कंपन्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले नाही, आज पेट्रोल 2 रुपयांनी कमी झालेय अशी खुशखबर अलिकडच्या काही वर्षांत तरी मिळालेली नाही. तेव्हा, खरंच बहिष्कार म्हणून नाही पण ग्राहक म्हणून एक दिवस संघटीतपणे पेट्रोल खरेदीच करायची नाही असं ठरवायला काय हरकत आहे. माझ्या मित्राने शेकडोंना हा मेल पाठवलाय, त्या सगळ्यांनी (माझ्यासकट) हा मेल आणखी पुढे फॉरवर्ड केलाय...
त्याच्या म्हणण्यानुसार, सदोदीत आपल्याच खिशात हात घालून आपल्याला गाळात घालणाऱया तेल कंपन्यांना या एक दिवसाच्या बहिष्काराने फार मोठा फटका बसू शकतो. सरकार जर महागाईने होरपळणाऱया ग्राहकांबद्दल काहीही करत नसेल तर आपणच संघटीत व्हायला हवे. आता खूप झालं, आम्हीही एकत्र येऊ शकतो, हे नफेखोर यंत्रणांना दाखवून द्यायलाच हवं!
पण, फक्त पेट्रोलसाठीच कशाला, नफेखोरांनी कृत्रिमरित्या भाववाढ केलेल्या प्रत्येक वस्तूसाठी ग्राहकांनी हेच संघटीत बहिष्काराचं अस्त्र वापरायला हवं, असं मला वाटतंय. 14 फेब्रुवारीला जोर का झटका सगळ्यांनाच देऊया की! मध्यंतरी कांद्याच्या दलालांनी आपल्याला इतकं रडवलं, त्याच मंडळींनी तिकडे कांदा, भाज्या उत्पादक शेतकऱयांनाही वेठीस धरलं होतं. आता कांदा वीस रुपयांनी विकला जातोय, तेव्हा नाशिकला पार 1 ते 9 रुपये दराने खरेदी केला जातोय, फ्लॉवर, कोंथींबीर रस्त्यावर ओतून टाकायची, शेतात सडवायची पाळी शेतकऱयावर आलीय. आपल्याकडचा कांदेवाला, भाजीवाला मात्र अजूनही चढय़ा दरानेच कांदा विकतोय, भाजी विकतोय. हे चित्र आपणच बदलू शकतो. कांदा खरेदी करणार नाही, महाग वाटणाऱया भाज्या घेणारच नाही, तूरडाळ नव्वदच्या घरात गेली असेल तर दुसऱया डाळी वापरू, पण व्यापाऱयांचे खिसे भरणार नाही, असं आपणच ठरवायला हवं.
एक दिवस, दोन दिवस, चार दिवस हे करून पाहूया. जाणवण्याइतपत फरक आढळून येईल. तेव्हा `14 फेब्रुवारी' हा `नो पेट्रोल, ओन्ली लव्ह' म्हणून लक्षात ठेवा. जोर का झटका देनाच पडेगा!

Thursday, February 3, 2011

फ्लेमिंगो पाहिलेला माणूस


फ्लेमिंगो पाहायला किती कष्ट पडतात ते माडगूळकर त्यांच्या `वाघाच्या मागावर' पुस्तकातील एका लेखात सांगतात... मुंबईला कंटाळून ते पुण्याला गेले होते. ब्याऐंशी सालची गोष्ट. त्यांचे पस्नेही प्रकाश गोळे, जस्टिस पटवर्धन अशी सारी मंडळी राजस्थानला पाणथळ आणि पक्ष्यांची बिऱहाडं पाहायला निघाले होते. सांभर तलावाजवळचा प्रसंग त्यांनी लेखात दिलाय... तलावाजवळ पोहोचेपर्यंत अंधार झाला होता, हजारो, लाखो पाखरं असावीत एवढं फक्त जाणवत होतं. दुसऱया दिवशी सकाळी ही मंडळी गेली तर खरोखरीच हजारोंनी अग्निपंखी नजरेसमोर होते. पण मधला चिखल, गाळ यामुळं अनेक हात दूर. माडगूळकरांनी कुतुहलानं आजूबाजूला चौकशी केली - पण, या पाखरांची अंडी, पिल्लं असं कुणाला कुठं दिसलं नव्हतं. हे सांगितल्यावर माडगूळकरांनी लेस्ली ब्राऊन या लेखकानं त्याच्या `एन्काऊंटर्स वुईथ नेचर' या आपल्या पुस्तकात फ्लेमिंगोवर काय लिहिलंय ते दिलंय, लेस्ली म्हणतो - त्याने आजवर अभ्यासलेल्या कोणाही प्राण्यानं वा पक्ष्यानं मला फ्लेमिंगो इतकं कष्ट आणि दुःख दिलेले नाही. लेसर फ्लेमिंगो (खालच्या मजकूरात प्रारंभी दिलेले छायाचित्र) कुठं पिल्लं घालतात हे शोधण्यासाठी त्याने दहा वर्षं घालवली. आफ्रिकेतील नॅट्रोन सरोवराभोवती तो मुक्काम ठोकून असायचा.
माडगूळकर राजस्थानात एवढं हिंडले, त्यावर सुंदर पुस्तक लिहायचं, त्यात त्यांनीच चितारलेली चित्रं, स्केचेस असं टाकून सजवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण, पुण्यात आल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं, एक चांगलं पुस्तक त्यांच्या मनातच राहिलं, काळाच्या ओघात विरून गेलं, अशी खंत त्यांनी प्रकट केली आहे.
माडगूळकरांना फ्लेमिंगोंसाठी राजस्थान गाठलं होतं. जर त्यांनी मुंबई सोडली नसती तर या निसर्गवेडय़ा लेखकाला इथल्या शिवडीच्या दलदलीत, फार तर उरण खाडीपट्टय़ात फ्लेमिंगो पाहायला मिळाले असते, असं मला आता फार वाटतंय.
जाता जाता - राजस्थानला आम्ही गेलो होतो ते केवळ भरतपूरसाठी. योगायोगाने डॉ. सलीम अलींना सायकल रिक्षातून फिरवणाऱया नंबर वन सायकल रिक्षातच बसून दिवसभर पक्षी ऐकले, पाहिले, तृप्त झालो. 2001मध्ये फ्लेमिंगो तर मी ठाण्यात अगदी माझ्या घराच्या अंगणात म्हणावे इतके जवळून पाहिले होते. 2001मध्ये ठाण्यात कोपरीतील मिठागर परिसरात आमची सोसायटी उभी राहिली, कंम्पाउंड वॉल तयार व्हायचीच होती, सर्पकुळ त्यांची वहिवाट सोडायला तयार नव्हतं, समोर तेव्हा मीठ उत्पादन होत होतं, पावसाळ्यात मीठासाठी तयार केलेली खाचरं, तळी भरून जायची आणि फ्लेमिंगोंसह कितीतरी पाहुणे पक्षी आमच्या समोर मुक्कामाला यायचे. अक्षरशः काही हातांवरून मी तेव्हा लागोपाठ दोन वर्षे गुलाबी गळा-मानेचे फ्लेमिंगो पाहिले होते. नंतरच्या वर्षी ते जरा दूर गेले आणि आताशा येतच नाहीत. आता त्यांचं तळंही कुठं राहिलयं म्हणा....