Monday, November 3, 2014

मध्य रेल्वे ‘झिंदाबाद’

दहा-पंधरा वर्षे उलटून गेली असतील, तेव्हाची गोष्ट. सेंट्रल रेल्वेचा प्रवासी म्हटल्यावर पश्चिम रेल्वेवाले त्या प्रवाशाकडे अतिव कणवेने पहायचे. हा प्रवासी दादरला उतरून पश्चिम रेल्वेच्या विरार गाडीत जरी शिरला तरी अगदी दयाद्र्र दृष्टीने त्याला न्याहाळून जमेल तशी जागाही करून द्यायचे.
central railwayत्याचवेळी कर्जत-कसारा इथून दिव्य करून रोजचे मस्टर गाठणा-या कर्मचा-याचा तर सत्कारच व्हायचा बाकी असायचा अनेक कार्यालयांमध्ये. त्याचीही छाती दररोज अभिमानाने फुलून यायची मध्य रेल्वेचा प्रवासी म्हणून. दररोज जिवाची बाजी लावून, तुडुंब गर्दीने भरलेल्या डब्यात दरवाजा राखणा-या ‘आतल्या’ प्रवाशांशी झुंजून डब्यात मुसंडी मारायची म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. मध्य रेल्वेच्या कृपाशीर्वादाने ही सिद्धी सेंट्रलच्या प्रवाशांनी संयम, सहनशक्ती पणाला लावून प्राप्त केली होती. पण गेल्या चार-पाच वर्षात कुणाची दृष्ट लागल्यागत झाले. मध्य रेल्वे चक्क वेळेवर चालू लागली, गाडय़ा वक्तशीर फलाटात शिरू लागल्या, उद्घोषणा ऐकण्याचे भाग्य ‘याची देही याची काना’ रोजच अनुभवास येऊ लागले. नवीन गाडय़ा आल्या. त्यांचेही पंखे सुरू, खिडक्या व्यवस्थित उघडमीट होणा-या. पंख्यात कंगवा-पेन घालण्याची गरज नाही की खिडक्यांशी डब्यातील कुणा मिस्टर युनिव्हर्सने पंजा लढवायची गरज नाही. कुठे गाडी बंद पडेना की कुठे रूळ तुटेना. पावसाचे पाणी भरून रेल्वे बंद होईल तर तेही नाही. सिग्नल फेल्युअर नाही. पावसामुळे रखडपट्टी नाही की कुठल्यातरी गोंधळामुळे लोकलकल्लोळ नाही. ठाण्यापुढच्या लोकांना, कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांना तर चुकल्या-चुकल्यासारखे वाटायला लागले होते. संपूर्ण महिन्यात कामावर एकदाही लेटमार्क नाही, खाडा नाही, लोकल बंद नाहीत की दीडदोन तास उशिराने नाहीत. वैतागायला, मध्य रेल्वेच्या नावाने खडे फोडायला काही कारणच नाही. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तर या गेल्या काही वर्षात ‘सेंट्रलवरच घर घ्यावे, नको ती विरार लोकल’ असे विचारही मनात बळावू लागले होते. वक्तशीरपणाबद्दल थेट स्पर्धा सुरू झाल्यामुळे पश्चिम रेल्वे उपनगरी विभागालाही थोडीशी असूयाही वाटायला लागली असावी. कुणातरी द्वाडाने वर दिल्लीकडे मध्य रेल्वेचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाठवून चहाडी केली असावी. मध्य रेल्वे एवढी सुधारली असेल तर प्रवाशांना ‘जीवन म्हणजे एक संघर्ष’ याची प्रचिती देण्याचे महत्तम कार्य कोण पेलणार? मध्य रेल्वेने दाखवलेले सुखाचे दिवस कुणाला सहन झाले नाहीत म्हणजे, कुणाला अत्यानंदाने झटका वगैरे आला तर? असे प्रश्नही बहुदा उपस्थित झाले असावेत. ब-याच खलाअंती मध्य रेल्वेची गाडी पुन्हा रुळांवरून घसरवण्याचा निर्णय दिल्ली दरबारी झाला आणि मध्य रेल्वे गेले वर्षभर पुन्हा तिच्या जुन्या ‘वळणावर’ आली आहे. गाडय़ा घसरणे, बंद पडणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, प्रवाशांना रेल्वेच्या निसर्गरम्य लोहमार्गावरून दुपारच्या उन्हात रपेट, तासनतास रखडपट्टी सारे काही आदेश मिळाल्यानुसार सुरू झाले आहे. उद्घोषकांनी मौन धारण केले आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ा रद्द, लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द वा अन्य मार्गाने वळवणे, अध्र्यावरूनच खंडित करून मागे वळवणे असे प्रकार आता जोरात आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दादर पॅसेंजर तर महिन्यातून २५ दिवस दादरऐवजी दिव्याहून सोडण्यात येते. बोजीबोचकी घेऊन प्रवाशांना दादरहून दिवा गाठण्याचे दिव्य करावे लागते. नव्या पिढीला आधीच्या पिढीने ऐकवलेल्या सेंट्रलवरील प्रवासाच्या थरारक अनुभवांची प्रचिती येऊ लागली आहे. गेली काही वर्षे सुरळीत चाललेले मध्य रेल्वेचे गाडे असे ‘मार्गावर’ आले असताना प्रवाशांची थोडीशी गैरसोय होणारच. प्रवाशांनी अशा गोष्टी फार मनाला लावून घेऊ नयेत, पूर्वीही घडायचाच की लोकलकल्लोळ. तेव्हा कुठे प्रवासी इतके वैतागायचे, असे मध्य रेल्वेच्या अधिका-यांचे म्हणणे असावे. यामुळेच गुरुवारी पहाटे कल्याणजवळ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस घसरल्यावर प्रवाशांची पायपीट सुरू होती, ऐन गर्दीच्या वेळी सारे काही ठप्प झाले असताना हे वरिष्ठ अधिकारी स्थितप्रज्ञता अंगी कशी बाणवावी, याचा अभ्यास करत केबिनमध्ये नाश्ता करण्यात मग्न होते. कल्याण रेल्वे स्थानकात शिरताशिरता अमरावती एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबे रुळांवरून घसरले होते. रूळ तुटल्याने आणि डबे उतरल्यामुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक बंद पडली. उपनगरी वाहतुकीचा बो-या वाजला. सकाळी कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांचा लेटमार्कच नव्हे अर्धा दिवसही कल्याणपासून ठाण्यापर्यंतच्या स्थानकांवर ताटकळून, रखडून वाया गेला. वाहतूक कशीबशी काही तासांनी सुरू झाली तेव्हाही गाडय़ा तासभर लेट होत्या. सर्वच वेळापत्रक कोलमडल्याने दिवसभरात एकूण ६३ फे-या रद्द करण्यात आल्या. सकाळी तर कल्याण ते ठाणे दरम्यान लोकल गाडय़ांची रांग लागली होती. अडलेल्या प्रवाशांना नाडण्याचे कर्तव्य रिक्षाचालकांनीही इमानइतबारे पार पाडले. प्रवाशांचे खिसा-पाकीट मोकळे केले. एवढे सगळे घडत असतानाही या अधिका-यांचे उदरभरण सुरू होते. मध्य रेल्वेवर पूर्वीसारखेच सारे घडू लागले आहे, त्याची फार फिकीर कशासाठी करायची, असाच त्यांचा आविर्भाव होता. प्रवाशांच्या खोळंब्याकडे लक्ष देण्यापेक्षा नाश्त्याच्या प्लेटमधील वडा-इडलीकडे लक्ष देणा-या या अधिका-यांनी चूक काहीच केली नाही. त्यांचे सुपरबॉस सेंट्रल रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मुकेश निगम या सा-या खेळखंडोब्याचे कारण ‘दुर्दैव’ असे सांगत असतील तर या अधिका-यांनी खुर्चीवरून उठायचे कष्ट तरी का घ्यावेत? गेले काही महिने मध्य रेल्वेची घसरगाडी सुरू आहे. महिनाभरात तर तीन वेळा याच प्रकारे मध्य रेल्वेने प्रवाशांची वाट अडवली आहे. दोन दिवसांपूर्वी कळवा कारशेडमधील ओव्हरहेड वायर तुटून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी याच प्रकारे गाडय़ा अडकून पडल्या होत्या. लोहमार्गाची, वाहतूक यंत्रणेची, उपकरणांची एकूणच देखभाल, दुरुस्ती आणि निगा या बाबी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. लोहमार्गाच्या दर्जामुळे असे प्रकार घडत असतील तर त्याचीही जबाबदारी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांवर आणि देखभाल-दुरुस्ती विभागावरच येते. लोहमार्गासाठी वापरले जाणारे धातू वा अन्य सामग्री योग्य दर्जाची असेल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी याच वरिष्ठांची आहे. तिकीट असो वा मासिक पास या सगळ्यासाठी लाखो प्रवाशांकडून भरमसाट प्रवास भाडे उकळणा-या मध्य रेल्वेला तांत्रिक खुलाशांची ढाल करून या हलगर्जीबद्दल स्वत:चा बचाव करता येणार नाही. याच देखभालीसाठी, दुरुस्ती कामांसाठी मध्य रेल्वे गेली अनेक वर्षे नित्यनियमाने रविवारी मेगा ब्लॉक घेत असते. रविवारच्या या दिवशीही प्रवाशांना लोकलकळा सहन कराव्या लागतात. देखभालीसाठी मेगाब्लॉक घेऊनही मध्य रेल्वेची अशी घसरण सुरू असेल तर केवळ ‘दुर्दैव’ म्हणून हात झटकून निगम वा इतर वरिष्ठ अधिका-यांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही.

हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते



आभासांचे अभ्र
आठवणींचे कवडसे

त्या संध्याकाळी


कळेना कोण कुणाला छळत होते
हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते
- @‪#‎शैलेंद्रशिर्के‬

साहित्यातील ‘प्रांत’वाद


यंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते.
Modiaanoयंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. या पारितोषिकासाठी केनियन लेखक गुगी वा थिओंग आणि जपानी लेखक हारुकी मुराकामी यांची नावं आघाडीवर म्हणून चर्चेत होती. प्रत्यक्षात ते दिलं गेलं पॅट्रिक मोदीआनो यांना. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते. मोदीआनो यांच्या नावाची घोषणा करणा-या पेजवर एका बाजूला एक प्रश्न विचारलाय. ‘आजचा कौल’ वा वाचक काय म्हणतात या टाइपचा. प्रश्न आहे की, मोदीआनो यांचे काहीतरी साहित्य तुम्ही वाचलं आहे का? होय वा नाही असे दोन पर्याय आहेत. आणि सुमारे ११ हजार वाचकांनी तिथे प्रतिसाद दिलाय. त्यापैकी ९१ टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.
याचा अर्थ मोदीआनो हे फारसं कुणालाही माहिती नसलेले लेखक आहेत, असाही घेता येऊ शकतो. किंवा ज्या वाचकांनी तिथे नकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे त्यांना वाचक म्हणून वरच्या यत्तेत प्रवेश मिळायला अजून अवकाश आहे, त्यांना बरंच वाचन करायचं आहे (मोदीआनो यांच्या पुस्तकांचेही) असाही घेता येईल. आपल्याकडेही मोदीआनो कितीजणांना माहिती आहेत असं विचारल्यावर प्रतिसाद उत्साहवर्धक असेल, याची खात्री देता येणार नाही.
मोदीआनो यांचं नाव जाहीर झाल्यावर विदेशातही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्याच. त्यांचं नाव जाहीर करण्याआधी पारितोषिक निवडसमितीचे सदस्य होरेस इंगडाल यांनी तर बॉम्बच टाकला. ‘पाश्चिमात्य साहित्याची पुरती वाट लागलीय. विद्यापीठं, संस्था यांच्याकडून मिळणारं अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती आणि लेखनकला ‘शिकवणारे’अभ्यासक्रम यामुळे ख-या साहित्याचा कसच नाहिसा झालाय. लेखकाला हे जे काही पैसे मिळतात, वित्तीय पाठबळ मिळतं त्यामुळे फोफावलेल्या व्यावसायिक लेखनवृत्तीचा साहित्यनिर्मितीवर नकारात्मक परिणाम होतोय. काही प्रमाणात मी हे समजू शकतो, पण यामुळे लेखकांची समाजाशी नाळ तुटते आणि त्याला आधार देणा-या संस्थांशी तो जखडला जातो.’ असं काय काय इंगडाल यांनी ‘ल क्रॉइक्स’या फ्रेंच दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्यावर भरपूर गदारोळ उठला. पारितोषिक जाहीर व्हायच्या आधी इंगडाल यांनी ही मुलाखत दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी मोदीआनो यांचे नाव जाहीर झाल्यावर तर, इंगडाल आणि स्वीडिश अकादमी समितीच अमेरिकन साहित्याच्या विरोधात आहे, म्हणूनच तिथल्या लेखकांचा पारितोषिकासाठी विचार होत नाही, अशी टीकाही झाली.
‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात या मुलाखतीचा गोषवारा वाचायला मिळाला. इंगडाल यांच्या म्हणण्यानुसार, लेखकाला आर्थिकदृष्टय़ा स्थिर करणा-या अनुदानांमुळे त्याच्यातला लेखक मारला जातोय. पूर्वीच्या दिग्गजांना असा आश्रय मिळत नव्हता. कुणी टॅक्सी चालवायचे, कुणी कारकूनी करायचे, कुणी वेटर तर कुणी आणखी कुठली तरी कामं करायचे. सॅम्युएल बेकेट आणि कितीतरी जण असेच झुंजले. तो विषम संघर्ष होता पण, साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या संघर्षानेच त्यांच्यातील लेखकाचं पोषण केलं. आपल्या पाश्चिमात्य साहित्य जगातच ही समस्या जाणवते. आशियाई आणि आफ्रिकन लेखकांचं साहित्य वाचताना त्यात काही प्रमाणात तरी कस जाणवतो, ही त्याची शेरेबाजी अनेकांना झोंबली.
इंगडाल या मुलाखतीत आजच्या कथित वेगळ्या, बंडखोर धाटणीच्या साहित्यावरही घसरले आहेत, ‘चौकट मोडण्याचा आव आणणा-या कादंब-या हल्ली खूप लिहिल्या जातात, पण प्रत्यक्षात त्या तशा नसतातच. चोखंदळ वाचकाला लगेच समजतं की यात काही दम नाही. यातलं चौकट मोडणं वगैरे निखालास बनवेगिरी, पूर्वनियोजित आहे हे जाणवतंच. यापैकी बहुतेक लेखक युरोपियन किंवा अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकलेले असतात. ते कुठलाही उंबरठा ओलांडत नाहीत वा मापदंड मोडत काढत नाहीत, कारण ज्या काही मर्यादा, चौकटी ओलांडायला हव्यात असं त्यांनी ठरवलेलं असतं तशा काहीही मर्यादा, चौकटी नसतातच.’
इंगडाल यांनी यापूर्वीही लेखनविषयक अभ्यासक्रम, विद्यापीठांचं अनुदान यावर टीका केली होती, पण या मुलाखतीतील थेट वार अमेरिकन साहित्यक्षेत्राच्या जास्तीच जिव्हारी लागले. आणखी एक दुखरी नस त्याला कारणीभूत आहे. ती म्हणजे १९९३ मध्ये टोनी मॉरिसन या अमेरिकन लेखिकेनं साहित्याचं नोबेल मिळवलं होतं. त्यानंतर आजतागायत अमेरिकन लेखकाला नोबेल मिळालेला नाही. त्यात इंगडाल यांनी आता थेट अमेरिकेतील साहित्यनिर्मितीला लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. आताचं साहित्य म्हणजे एखादी खरेदीविक्रीची वस्तू असते तसं झालं आहे. त्याची समीक्षा करण्याइतकं काहीच नाही. जे काही दर्जेदार साहित्य आहे त्यातही त्यामुळे बदल झाला आहे, असं इंगडाल बोलल्यावर तर हलकल्लोळ झाला. ‘ऑब्झव्‍‌र्हर’साठी लिहिणारे समीक्षक रॉबर्ट मक्रम यांनी तर इंगडाल यांना अमेरिकाविरोधी आणि ढुढ्ढाचार्य ठरवून टाकलं.
यापूर्वीही इंगडाल यांनी अमेरिकेतील साहित्यनिर्मितीवर, दर्जावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर जोरदार प्रतिहल्ला झाल्यावर इंगडाल यांनी त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची भूमिका घेतली. ‘महत्त्वाच्या अमेरिकन लेखकांना नोबेल जिंकण्याची संधी अजिबातच नाही असंच जणू मी म्हटल्यासारखे सारेजण माझ्यावर तुटून पडले असले तरी मी तशा अर्थाने काहीही म्हणालेलो नाही. नोबेलसाठी पात्र असे अमेरिकन लेखक नाहीत असं मी कधीही म्हणालो नाही. माझं म्हणणं एवढंच की, जागतिक साहित्याचे प्रवाह, अनुवाद यांची अमेरिकेतील उपलब्धता अत्यंत सीमीत असल्यामुळे अमेरिकन साहित्यक्षेत्राला, समीक्षेला मर्यादा आल्या आहेत. जे काही घडतंय, लिहिलं जातंय ते अमेरिकाकेंद्रीत. जणू एखाद्या आरसेगृहात अमेरिकेचीच प्रतिमा सगळीकडून प्रतिबिंबित होत आहे.’ इतर घडामोडींचा अमेरिकन साहित्यात अजिबात पडसाद उमटत नाहीत असंच काहीसं इंगडाल यांना सुचवायचं होतं. ते अर्थातच अमेरिकन लेखक आणि समीक्षकांच्या पचनी पडलेलं नाही.
इंगडाल असं परखड बोलल्यामुळे यंदाचं नोबेल आशियाई वा आफ्रिकन लेखकाला मिळणार अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. काही नावांवर सट्टाही लागला होता. पण ते मिळालं मोदीआनो यांना, तरीही इंगडाल यांच्या या मुलाखतीमुळे काही प्रश्न मात्र छळू लागले आहेत.
उदाहरणार्थ, लेखकाला मग कुटुंबकबिला सांभाळण्यासाठी आर्थिक आधार मिळूच नये का, असा आधार मिळाला तर त्याच्या लेखनाचा कस कमी होतो का, त्याने त्याच्या लिखाणातून संघर्ष मांडला तरच ते लिखाण कसदार, दर्जेदार, पारितोषिकासाठी विचार व्हावा अशा दर्जाचं ठरतं का, बाकीच्यांचे साहित्य मग या निकषांनुसार फुटकळ, सुमार ठरवावं का, या प्रश्नांची उत्तर शोधायला हवीत.
आणि लेखक लिहिता कधी होतो. वास्तवाचे चटके बसल्यावर, परिस्थितीच्या गर्तेत गरगर फिरल्यावर, आत्मा काजळून टाकेल असे दाहक अनुभव घेतल्यावर की तुम्ही फक्त लिहा, बाकी काही करू नका. तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था, कुटुंबाचा उदरनिर्वाह याची जबाबदारी आमची. असं त्याला आश्वस्त केल्यावर प्रतिभेचा झरा त्याच्यातून उमळतो. या प्रश्नांचीही उत्तरं मिळवायला हवीत. प्रयत्न करूया!

हॅप्पी दिवाळी!!



हॅप्पी दिवाळी!!

दिवाळीत धमाल सुरू होती. फटाक्यांचे धडामधूम, मिठाई, फराळ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणत शुभेच्छांची लयलूट.

शुभेच्छा संदेशांचा नुसता पाऊस पडतोय. प्रत्यक्ष फोन करण्याची, दोन शब्द बोलण्याची कुणाला फुरसद नसली तरी मेसेज टाइप करण्यासाठी, फॉर्वर्ड करण्यासाठी पाच-सात मिनिटे कामी येत आहेत. जो बघाल तो मोबाइलमध्ये अडकलेला. मान खाली, पाय चालू. समोरचा पण तसाच असेल तर टक्कर अटळ. सुदैवाने फटाके पाहण्यासाठी मान अधूनमधून वर होत असल्याने अनेक अपघात, टकरी होता होता राहिल्या आहेत. नाही तर दिवाळीत वेगळेच फटाके फुटले असते.

मोबाइल कंपन्यांनी भाववाढ करून एसएमएस संदेशवहनाची वाट अडवली असली तरी व्हॉट्स अ‍ॅपने संदेशवहनाचे महाद्वार जणू खुले केले आहे. या महाद्वारातून काहीही पाठवता येते. नुसते संदेश, चित्रं, छायाचित्रं, अ‍ॅनिमेशन, व्हीडिओ जे हवं ते. त्यामुळे या संदेशांमध्ये सुद्धा वैविध्य आलं आहे. एरव्हीही सणासुदीचे दिवस म्हणजे व्हॉट्स अ‍ॅपवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव. जेवढे वाचाल तेवढे कमी… यातही नव्वद टक्के फॉर्वर्ड केलेले. म्हणजे दुसºया कुणीतरी पाठवलेले कॉपी पेस्ट करून जाने दो आगे टाइपचे. त्यात कधी कधी गोंधळ होतो. मूळ पाठवणाºयाने त्याचे नाव शुभेच्छांखाली लिहिले असले तरी ते खोडण्याचे राहून जाते. मग जी व्यक्ती माहितीतील नाही तिने पाठवलेला संदेश कुणातरी माहितीतील व्यक्तीकडून आपल्याला मिळतो. कधी या ढिसाळपणाचा रागही येतो आणि कधी गम्मतही वाटते.

दसरा-दिवाळीत तर जेवढे शुभेच्छा संदेश पाठवले जातात त्यांच्या आकड्याची विक्रम म्हणून नोंद घ्यायला हरकत नसावी असं कधीकधी वाटतं. भरपूर पुरेपूर अशा प्रकारचं हे संदेशसाहित्य असतं. त्यातला बहुतांशी भाग हा आधी म्हटल्याप्रमाणेच फॉर्वर्डच असतो पण, कधी कधी काही ‘संदेशमौक्तिके’ही हाती लागतात. काही निखळ शुभेच्छा असतात, काहींमध्ये थट्टेचा सूर असतो, काही मजेशीर असतात तर, काही खरोखरीच मार्गदर्शक, काहीतरी उपयुक्त सांगणारे, मांडणारे असे असतात.

यंदाच्या दिवाळीत असे अनेक संदेश व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवले गेले असतील. त्यापैकी काही उपयुक्त, मार्गदर्शनपर आणि काही मजेशीर असे संदेश पुढे देतोय -

एक संदेश आला होता – ‘‘कुणी शार्पशुटर आहे का, आपल्या ग्रुपवर?

का म्हणजे काय?

टिकल्यांचं पाकीट फोडायचय यार..’’

आणखी एक असाच मजेशीर होता -

‘‘तुम्ही स्वत:ला शेरदील, वाघ समजत असाल तर त्वरित संपर्क करा..

दिवाळीचा किल्ला केलाय… त्या किल्ल्यावरच्या गुहेत बसण्यासाठी तुमची गरज आहे…’’

हे सगळे टाइमपास प्रकारचे संदेश. पण, काही खरोखरीच विचार करायला लावणारे असतात. वेगळी, समाजपयोगी दिशा दाखवणारे असतात. जसा हा संदेश -

धनत्रयोदशीच्या दिवशी आलेला हा संदेश धनवृद्धी कशी कराल, तुमची आर्थिक स्थिती कशी मजबूत ठेवाल याबद्दल काही चांगल्या टीप्स देतो. तुमच्या क्षमतेइतके, पात्रतेइतके वेतन मिळवा आणि खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा… बजेट हा आजच्या युगाचा एकाक्षरी मूलमंत्र ध्यानात ठेवा… आपली कमाई लक्षात घेऊन प्रत्येकानेच बजेट आखले पाहिजे, खर्चाचीही आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी केली पााहिजे.. याचा काटेकोर अवलंब केलात तर श्रीमंत होणे अशक्य नाही. क्रेडिट कार्डची देयके वेळच्या वेळी चुकती करा… केवळ क्रेडिट कार्डच नव्हे तर वीज बिल, टेलिफोन बील अशी सगळीच बिले मुदतीआधी भरलीत तर तुमची बचत तर होईलच पण थोडा अधिकचा पैसाही तुमच्याजवळ असेल… निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीही तजवीज करून ठेवा. तशा एखाद्या विमा योजनेत पैसे गुंतवा. बचत खात्यात शिल्लक वाढून फार काही फायदा होत नसतो, बँकेतील बचत खात्यातील रकमेवर मिळणाºया व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळाच. यामुळेच तुमची बचत योग्य प्रकारे, फायदेशीररीत्या गुंतवा. गुंतवणूक मॅच्युअर झाली की लगेच दुसरीकडे फिरवा. तो पैसा जितका काळ तसाच पडून राहील तेवढे तुमचा तोटा अधिक. गुंतवणूक योजनांच्या माहितीसाठी तुम्ही स्वत: अभ्यास करा, फक्त मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. अडीअडचणीच्या प्रसंगांसाठी पैसा राखून ठेवा वा तात्काळ मोकळा करता येईल अशा योजनांमध्ये गुंतवा. म्हणजेच तुमचा सध्याचा खर्च, बिलं भागवता येतील आणि तीन ते सहा महिने खर्च भागेल अशी बचत म्हणजेच अडीअडचणीसाठीचा पैसा. चांगली विमा योजना घ्या. इच्छापत्र बनवा आणि ते अपडेटही करत राहा. तुमच्या सर्व गुंतवणुकीचं, बचतीचं आणि देणग्या, वैद्यकीय खर्च अशा सगळ्याच्या नोंदी एकत्र ठेवा. तरच प्राप्तीकरातून सवलत, वजावट आदीचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि ऐनवेळी धावाधाव होणार नाही.

आणखी एक संदेश थोडा भावनिक होता – मोबाइल, टीव्ही बंद करून आईबाबांनी मुलांना दिलेला वेळ हेच मुलांसाठी धन, पतीच्या नजरेत दिसणारं प्रेम हेच पत्नीसाठी धन, वृद्ध मातापित्यांची काळजी घेणारी मुलं हेच त्या ज्येष्ठांचे खरे धन… हाही विचार करायला लावणारा होता.

सामाजिक जबाबदारीचं भान देणारा हा एक संदेशही सर्वत्र फिरत होता – डी फॉर डोनेट. गरजूंना कपडे, अन्नधान्य दान करा. आय फॉर इल्युमनेट. निसर्ग संरक्षणाची जाण तुमच्यात जागवा. डब्लू फॉर विश. जागतिक, राष्ट्रीय आणि स्वत:ची भरभराट व्हावी, शांतता व समाधान लाभावे यासाठी प्रार्थना करा. ए फॉर अव्हॉइड. फटाके, वीज, अन्न यांची नासाडी टाळा. प्रदूषण टाळा. एल फॉर लाइट. आध्यात्मिक तेजाने तुमचे आयुष्य उजळून टाका. आय फॉर इन्स्पायर. सौहार्द, बंधुभाव याची साक्ष म्हणून दिवाळी साजरी करण्यास सर्वांना उद्युक्त करा…

दिवाळीचा एक संदेश फारच सुंदर होता… चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती.

टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती

थेंबभर तेल म्हणे, मी देईन साथ…

हेच तर महत्त्वाचं असतं… ऐक्य, परस्परांना पाठबळ आणि अंधकार दूर करण्याची एकत्रित ताकद… ती तुम्हाला कायमच लाभावी याच शुभेच्छा!!

Monday, December 16, 2013

स्वत:ला कमी गुण देणारा लेखक अॅलिस्टेअर मॅक्लिन


 ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ पुस्तक आधी वाचलं होतं की, चित्रपट आधी पाहिला ते आता आठवत नाही. त्या काळात, म्हणजे कॉलेजात पाऊल टाकल्यावर जे उंडारलेपण अंगात येतं, त्यानुसार बहुधा चित्रपट आधी पाहिला गेला असावा. चित्रपट अर्थातच भन्नाट होता. कथानक सशक्त वगैरे शब्दसंपत्तीचा परिचय झाला नव्हता तेव्हाची गोष्ट. काय सॉलिड स्टोरी आहे, जबरा.., एवढय़ावर आमची गाडी थांबायची. पण, याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बनला आहे आणि अॅलिस्टेअर मॅक्लिन नावाच्या कुणा लेखकाने ही जबरदस्त कथा लिहिली आहे, याची माहिती जमा झाली होती. यथावकाश कादंबरीही हातात आली, वाचून झाली आणि मॅक्लिनने माझा ताबा घेतला. खरं तर ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ने ताबा घेतला असं म्हणायला हवं. कारण, नंतर त्याचं लगेचच अगदी प्रयत्नपूर्वक मिळवून वाचलेलं पुस्तक म्हणजे ‘फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन. या दोन कादंबऱ्यांमध्ये दहा वर्षाचं अंतर आहे. या पुस्तकामुळे मी इतका प्रभावित झालो नव्हतो. ‘द गन्स ऑफ नेव्हरॉन’ ही मॅक्लिनची दुसरी कादंबरी. ‘एचएमएस युलिसेस’ ही पहिली. दुस-या महायुद्धाच्या कालखंडात समुद्रावर लढल्या गेलेल्या युद्धाचे सर्वाधिक वास्तवपूर्ण वर्णन असलेली कादंबरी म्हणून तिची आज कल्ट क्लासिकच्या प्रभावळीत गणना होते. युद्धावर अधिकारवाणीने बोलणे मॅक्लिनला सहज शक्य होते. कारण, १९४१ ते १९४६ या काळात तो नौसैनिक होता. मॅक्लिनचा जन्म १९२२चा. दुस-या महायुद्धाला तोंड फुटलं, तेव्हा तो विशीचा तरणाबांड युवक होता. त्या काळातील शिरस्त्यानुसार, मुलगा तरुण झाला की त्याचं पाऊल सरळ युद्धभूमीवरच पडायचं. अॅलिस्टेअरचं तेच झालं. तो इंग्लंडच्या शाही नौदलात नौसैनिक म्हणून दाखल झाला. पीएस बोर्नमाऊथ क्वीन या विमानविरोधी तोफा बसवलेल्या जहाजावर त्याची रवानगी झाली. इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या किनारपट्टी भागात ही नौका गस्त घालत असे. १९४३मध्ये एचएमएस रॉयेलिस्ट या युद्धनौकेवर सेवा बजावताना अटलांटिक महासागरातून ये-जा करणाऱ्या मालवाहू नौकांना सुरक्षा कवच पुरवण्याची जबाबदारी त्याच्या तुकडीवर होती. याच युद्धनौकेवरील सेवाकाळात त्यानं दक्षिण फ्रान्स, तिरपित्झ, नॉर्वेची किनारपट्टी, भूमध्य समुद्र, क्रिट आणि एजिअन तसेच अतिपूर्वेकडील बर्मा, मलाया आणि सुमात्रा या भागांमध्ये प्रत्यक्ष युद्धाचा, चकमकींचा भरपूर अनुभव घेतला. युद्धकाळातील थेट सहभाग आणि अनुभवांचा खजिना त्याला पुढे लेखक म्हणून उपयोगी आला. युद्धसमाप्तीनंतर ग्लासगो विद्यापीठात इंग्रजीचं अध्ययन करत असतानाच त्याने खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी कथा लिहायला सुरुवात केली होती. बहुतेक कथा अर्थातच सागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर असायच्या. याच वेळी १९५४मध्ये त्याने एक कथालेखन स्पर्धा जिंकली आणि कॉलिन्स प्रकाशन संस्थेचं त्याच्याकडे लक्ष गेलं. मॅक्लिननं एक कादंबरी लिहून द्यावी, असं त्यांनी सुचवल्यावर तो बैठक मारून बसला. त्याच्याजवळ अनुभवांच्या पोतडीत पुष्कळ अस्सल चिजा होत्या, त्यातून जी कादंबरी समोर आली तीच ‘एचएमएस युलिसेस’. बेस्टसेलर लेखक म्हणून मॅक्लिनची ओळख वाढू लागली. मॅक्लिन जरा विक्षिप्तच होता. आपल्या कादंबऱ्या कथानकामुळे खपतात, मॅक्लिन या नावामुळं नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्यानं इयान स्टुअर्ट या टोपणनावानं दोन कादंबऱ्या लिहिल्या. त्याही तडाखेबंद खपल्या. १९६०मध्ये तो इतका लोकप्रिय होता, गाजत होता, पैशांच्या राशीत लोळत होता की, त्याला कर वाचवण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडलडला मुक्काम ठोकावा लागला होता. मॅक्लिन हे जवळपास ब्रँडनेम बनलं असतानाच १९६३ ते १९६६ या कालखंडात लेखणी बाजूला ठेवून त्यानं इंग्लंडमध्ये दोन-तीन हॉटेलं सुरू केली होती. ती फार चालली नाहीत, हे चाहत्यांचं सुदैव. त्यामुळे तो पुन्हा लिखाणाकडे वळला आणि नव्या जोमानं लिहायला लागला. जेम्स बॉण्डचा लेखक इयान फ्लेमिंगही त्या वेळी जोरात होता. त्याच्या तुलनेत मॅक्लिन फारच क्लिन लिहायचा. सेक्स नाही, रोमान्स नाही. फक्त साहस आणि थरारक घटना. कथानकात बाकी भानगडी आणल्या तर मूळ कथा, त्यातला थरार बाजूला पडतो, त्यातली मजा उणावते, असं तो म्हणायचा. ते खरंच होतं. ‘एचएमएस युलिसेस’पासून फिअर इज द की, द गोल्डन रांदेहू, आइस स्टेशन झेब्रा, व्हेअर इगल्स डेअर (हो, हीपण त्याचीच अफलातून कादंबरी), पपेट ऑन अ चेन, द लास्ट फ्रंटियर, ब्रेकहर्ट पास, सँटोरिनी, व्हेन एट बेल्स टोल.. यापैकी त्याच्या कुठल्याही कादंबरीत प्रेम, शृंगार यांना फारसा थारा नाही. त्याचे कथानायक परिस्थितीशी, खलनायकांशी चिवटपणे झुंज देतात, टिकून राहतात, विजयी होतात. सर्वसामान्य वाचकांना हवा तो थरार, तात्पुरती का होईना पण जाणवणारी उमेद, प्रेरणा हे सारं त्याच्या कथानकातून, नायकाच्या संघर्षातून नेमकं व्यक्त व्हायचं. सागरी युद्धाचं तंत्र, युद्धकाळातील त्याचे प्रत्यक्ष अनुभव यांचं आकर्षक मिश्रण त्याच्या अनेक कादंबऱ्यांमधून आढळतं. २८ कादंबऱ्या, एक कथासंग्रह आणि चार पटकथा त्याच्या नावावर जमा आहेत. आणि यातील प्रत्येक कादंबरी बेस्टसेलर ठरली होती. त्याच्या एकूण १६ कादंबऱ्या आणि २ कथांवर चित्रपट बनवले गेले. त्यापैकी चार चित्रपटांच्या पटकथा तर त्यानेच लिहिल्या होत्या. हॉलिवुडमधील एका स्टुडिओने चित्रपटांच्या कथाकल्पना लिहिण्यासाठी १९८०मध्ये त्याला करारबद्ध केल्यावर, मॅक्लिनने ‘युनायटेड नेशन्स अॅण्टी-क्राइम ऑर्गनायझेशन’ (युनॅको) ही काल्पनिक संस्था कागदावर उतरवली. या संस्थेच्या कामगिरीबद्दल लिहिलेल्या त्याच्या दोन कथांवर चित्रपट (‘होस्टेज टॉवर’ आणि ‘डेथ ट्रेन’) बनवले गेले. ‘व्हेअर इगल्स डेअर’ त्याने लिहिला तो रिचर्ड बर्टनसाठी. (स्वित्झर्लंडलडला बर्टनच्या कबरीपासून जवळच मॅक्लिनही विसावला आहे) बर्टनला त्याच्या मुलासोबत पाहता येईल असा एक साहसपट बनवायचा होता. त्याने मॅक्लिनला सांगितल्यावर त्याने ‘व्हेअर इगल्स डेअर’ची पटकथा लिहायला घेतली आणि त्याच वेळी कादंबरीही सुरू केली. कादंबरी आणि पटकथेत खूप फरक आहे. रुपेरी पडद्यावर क्लिंटने घेतलेले सर्वाधिक बळी या चित्रपटात आहेत, असं म्हटलं जातं. ‘गन्स ऑफ नेव्हरॅन’ आणि ‘व्हेअर इगल्स डेअर’चं कथानक बरंचसं एकसारखं आहे. पण दोन्हीकडे मॅक्लिन फॉर्म्युला हीट झाला. मॅक्लिन सिद्धहस्त लेखक होता. पहिलीच कादंबरी बेस्टसेलर ठरल्यावरही जन्मजात मध्यमवर्गीय सावधपणामुळे त्यानं शिक्षकाची नोकरी लगेचच सोडली नाही. ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’नं त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिल्यावर, आता आपलं नाव चालतंय, अशी खात्री झाल्यावरच तो पूर्णवेळ लेखन करू लागला. या पुस्तकाच्या चार लाख प्रती पहिल्या सहा महिन्यांत खपल्यानंतर कुठे त्याने शिक्षकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पहाटेच उठून टाइपरायटरची टकटक सुरू करायची ती दुपापर्यंत, अशी त्याची लिखाणाची पद्धत होती. कच्चा आराखडा, फेरफार, पुनर्लेखन, पुन्हा-पुन्हा सुधारणा, त्यानंतर फायनल ड्राफ्ट यातलं काहीच त्याला मान्य नसायचं. एकदा लिहिलेल्या कथानकात काहीही दुरुस्ती करायला तो नाखूश असायचा. एकदा त्याच्या कादंबरीत काही सुधारणा हव्यात, असं त्याला पटवायला प्रकाशकांनी त्याच्याकडे प्रतिनिधी पाठवला होता. तो माणूस स्वित्झर्लंडलडला मॅक्लिनकडे पोहोचण्यापूर्वीच त्या पुस्तकावरील चित्रपटाचे हक्क विकले गेले होते. अर्थातच पुनर्लेखन वगैरे काहीही न सुचवता प्रकाशकाचा माणूस इंग्लंडला परतला. ‘कादंबरीचा शेवट माझ्या डोक्यात फिट्ट होईतो मी पहिलं वाक्यही लिहीत नाही, मी एकदा लिहिलेलं पुन्हा वाचतही नाही. लिहून झालं की थेट प्रकाशकांकडे रवाना करतो’, असं तो सांगायचा. १९७०च्या दशकात दोन कोटी प्रती खपवणाऱ्या या लेखकाची राहणी इतका प्रचंड पैसा कमावूनही एकदम साधी होती. ते नैतिकतेला धरून नसल्याचं दडपण त्याच्यावर असायचं. १९८७मध्ये तो गेला तेव्हा स्वित्झर्लंडलडमधील एका फ्लॅटमध्ये राहत होता. डाळ-तांदूळ जे लागेल ते विकत आणायचं, स्वत:चं जेवण बनवायचं अशी त्याची दिनचर्या होती. अफाट प्रसिद्धी, लोकप्रियता मिळूनही मॅक्लिनला त्याचा गर्व नव्हता. ‘साहित्यविश्वातील मी एक साधा प्रवासी आहे. माझी वाटचाल ती काय, एका पुस्तकाकडून दुस-या पुस्तकाकडे धडपडत जातो. कधी तरी मी खचितच खूप चांगलं लिहीन अशी आशा मात्र मी सोडलेली नाही’, असं म्हणण्याइतका तो ‘डाऊन टू अर्थ’ होता. आजही त्याची पुस्तकं खपतात, पदपथांवर मांडलेल्या पसाऱ्यात मॅक्लिनच्या कादंबऱ्यांवर हमखास नजर खिळते. तेव्हा वाटतं, मॅक्लिननं लेखक म्हणून स्वत:ला फारच कमी गुण दिले होते! ंं

Sunday, September 22, 2013

पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन धम्माल पुन्हा पुन्हा..

‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे.
‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे. कुठल्या ना कुठल्या मूव्ही चॅनेलवर चार चित्रपटांच्या या मालिकेतील कुठला ना कुठला चित्रपट सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री, उत्तररात्री कधी ना कधी सुरूच असतो. आणि आपण या चॅनेलवर उशिरा जरी पोहोचलो असलो, चित्रपट अध्र्या वाटेवर पुढे सरकला असला तरी उर्वरित चित्रपट पूर्ण होईतो ते चॅनेल बदलण्याची वा टीव्ही बंद करण्याची इच्छा होणे अशक्यच असते..
‘कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल’ हा या मालिकेतील पहिला चित्रपट. २००३ मध्ये झळकलेल्या या चित्रपटाबद्दल खुद्द निर्माते आणि स्टुडिओही चित्रपट कितपत चालेल याबद्दल साशंक होते. म्हणून प्रारंभी फक्त ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ एवढेच नाव ठेवण्याची स्टुडिओची तयारी होती. पण कुठल्या तरी बैठकीत कुणीतरी भविष्याचे शुभसंकेत दिल्यासारखी एक सुशंका उपस्थित केली.. ‘चित्रपटात जॉनी डेपसारखा स्टार आहे, भन्नाट कथा आहे, पडद्यावर तरी सारं मस्त धमाल जुळून आल्यासारखं दिसतंय. मग चित्रपट चालला तर? दुसराही भाग काढता येईल की..’, अशी सगळी चर्चा झाल्यावर मग मूळ नावाला ‘कर्स ऑफ दी ब्लॅक पर्ल’ जोडण्यात आलं. चित्रपट प्रदर्शित झाला. कॅप्टन जॅक स्पॅरो, ओरलँडो ब्लूमचा विल टर्नर, छान निरागस दिसणारी किआरा नाइटलेने साकारलेली एलिझाबेथ सगळ्यांना प्रेक्षकांनी फुल्ल मार्क्‍स दिले. बॉक्स ऑफिसवर खणखणाट करणा-या या चित्रपटानं धमाल उडवली. त्या वर्षी तब्बल पाच ऑस्कर पुरस्कारांसाठी या चित्रपटाची शिफारस झाली होती. कॅप्टन जॅक स्पॅरोसह सा-याच व्यक्तिरेखांची वेशभूषा, रंगभूषा, ध्वनी संकलन, स्पेशल इफेक्ट्स सारं सारं जबरदस्त होतं. या प्रत्येक किमयागारीसाठीच ऑस्कर शिफारस झाली होती हे वेगळे सांगायची गरज नाही. प्रेक्षकांवर या चित्रपटानं त्या वेळी इतका प्रभाव टाकला की पुढचा भाग कधी येणार, अशी विचारणा प्रेक्षकांकडून होण्याआधीच दिग्दर्शक गोर व्हर्बिन्स्की आणि त्याच्या टीमने, निर्मात्यांनी पुढच्या भागाची तयारी सुरू केली होती.
महाइब्लिस, महाअतरंगी असा कॅप्टन जॅक स्पॅरो, त्याला साजेसे असे त्याचे बदमाश साथीदार, त्यांचे जहाज ब्लॅक पर्ल, जॅकशी खुन्नस असणारा जेफ्री रशचा कॅप्टन बाबरेसा, खवळलेल्या समुद्राला भेदून वर येणारे भुताळी जहाज ‘द फ्लाइंग डचमन’, या जहाजावरील अर्धमृत खलाशी, भरसमुद्रात या चाच्यांच्या आणि ब्रिटिश आरमाराच्या ताफ्याशी होणा-या चकमकी, चाच्यांनी दडवलेल्या खजिन्याच्या प्रचंड राशी.. वाढत्या वयातही मनाच्या कुठल्या तरी कोप-यात खोडकर मुलासारखं दडून राहिलेल्या शैशवाला भुलवणारं, साहसी, स्वप्नाळू भाववृत्तीला उत्तेजित करणारं, गुंगवून टाकणारं असे हे कथानक. जॅक स्पॅरोच्या करामती मग डेड मॅन्स चेस्ट, अ‍ॅट वर्ल्डस् एन्ड, ऑन स्ट्रेंजर टाइड्स या पुढच्या भागांमधून प्रेक्षकांसमोर आल्या आणि हे सर्व चित्रपटही तितकेच चालले, गाजले. अपवाद म्हणावा तो चौथ्या भागाचा. तो रॉब मार्शलने दिग्दर्शित केला होता. अनेकांना या संपूर्ण मालिकेतील हा चित्रपट बराचसा बोअर, कंटाळवाणा वाटला आणि तो आलाही ब-याच उशिरा.
जेरी ब्रुकहेइमर फिल्म्स आणि वॉल्ट डिज्नी पिक्चर्स यांनी या चित्रपटांमुळे चिक्कार पैसा कमावला. व्हीडीओ गेम्सही आले. अनेक गाजलेल्या चित्रपटांचं मूळ एखाद्या कादंबरीत वा कथेत असतं. इथे तसं काहीच नव्हतं. डिज्नी पिक्चर्सला ही सगळी आयडीयाची गम्मत सुचली ती त्याच्या डिज्नीलँड पार्कातील पायरेट्स राइडमुळे. या आयडियाचं पुढे पटकथाकार आणि संवादलेखकांनी सोनं केलं. चटपटीत संवादांचाही चित्रपटाच्या यशात मोठा सहभाग असतो हे पायरेट्सच्या संवादांनी विशेषत: जॅक स्पॅरोसाठी लिहिल्या गेलेल्या संवादांनी सिद्ध केले.
या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी ताटकळलेल्या चाहत्यांसाठी खूशखबर अशी की या चित्रपटमालिकेतील पुढचा म्हणजेच पाचवा भाग ‘डेड मेन टेल नो टेल्स’च्या निर्मितीचे काम सुरू आहे. ‘कोन-टीकी’ चित्रपट बनवणा-या जोकीम रॉनिंग, एस्पेन सँडबर्ग या दिग्दर्शकद्वयीकडे पाचव्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ‘नाही-नाही’ म्हणणारा जॉनी डेप, ‘आता हा भाग शेवटचाच’ म्हणत पुन्हा जॅक स्पॅरोची पायरेट हॅट डोक्यावर चढवून त्याचा इरसालपणा दाखवणार आहे. जॅक स्पॅरोच्या अतरंगीपणासह इतर व्यक्तिरेखांचेही अंतरंग खुलवणारा पटकथाकार टेड एलियट या नव्या कथानकासाठीही व्यक्तिरेखांना आकार-उकार देणार आहे. येथे जॅक आहे, बाबरेसा आहे, चेटकिणी, भुतेखेते आहेत, जॅकसाठी नवी नायिका आहे आणि एक नवी जोडीही आहे. बम्र्युडा त्रिकोणाच्या रहस्याचा पायरेट्स स्टाइल पर्दाफाशही या नव्या कथानकातून होईल, अशी खबर आहे.एवढया सगळ्यासाठी २०१६ उजाडायची वाट बघावी लागणार आहे. एवढेच काय ते पायरेट्स आणि जॉनी डेपच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग करणारे आहे.

Friday, September 20, 2013

बाप्पा आम्हालाही आशा आहे..

This is what I felt aftr seeing the visarjan DHINGANA.. But there is still hope..
Please read
http://prahaar.in/shadow/135488


बुधवारचीच गोष्ट.. बाप्पा घरी परत निघाले होते त्या वेळची. कर्णकर्कश्श गोंगाटात घराच्या भिंतीच नव्हे माणसे आणि प्राणी-पक्षीही थरथरत होते.
वेळ रात्री बारा-एकची स्थळ- हिंदुजा रुग्णालयाचा परिसर, तो चौकच. नीरव शांतता वगैरे काही नाही. मुंबई तशीही कधी झोपत नाहीच विसर्जनच्या बुधवारी तर पाहायलाच नको..दणदणाट. कानठळ्या बसवणारे डीजे संगीत. हातगाडय़ा, टेम्पो, ट्रक मिळेल त्या वाहनावर चढवलेली भल्याथोरल्या स्पीकरची दहीहंडी. गणपती मिरवणूक चाललीय. कर्णकर्कश्श गाण्याबजावण्याचा गोंगाट ११० डेसीबल्सच्या वर.. कपाळावर आठय़ा आणण्याची कोणाची हिंमत आहे? कोन रे तो, आमच्या सनाला आडवा येतो, घ्या त्याला.. ए बजाव.. रुग्ण गेले खड्डय़ात, झोपू पाहणारे रहिवासी गेले ढगात.. बजाव ढिंचॅक..
या कानठळी संगीताच्या तालावर ‘धुंद’ कार्यकर्ते हातपाय उडवत होते, रासायनिक गुलाल उधळत होते. आणि याच कर्णकर्कश्श गोंगाटात घराच्या भिंतीच नव्हे माणसे आणि प्राणी-पक्षीही थरथरत होते. या गोंगाटाचा गलका, फटाक्यांच्या माळांचा कडकडाट असह्य झालेल्या इथल्याच एका कुटुंबाने पाळलेल्या लारा नावाच्या कुत्रीने त्याचा धसका घेऊन जीव सोडला.. हीदेखील विसर्जनाच्या बुधवारचीच गोष्ट..
००००
स्थळ पुणे..
वेळ – विसर्जनाची म्हणजे दिवसभरातील कोणतीही
पुण्यातील विसर्जन सोहळा म्हणजे काय शिस्त.. सगळं कसं पद्धतशीर, नियमाने, क्रमानुसार.. किती र्वष ऐकत आलोय पुण्याची कीर्ती. तिथले मानाचे गणपती, तिथली लेझीम पथकं, ढोल पथकं, बँड, रांगोळ्यांचे सडे.. सगळं ऐकून मनात अगदी अप्रूप दाटून आलेलं..
त्यात वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवरून मंगळवारपासून पुण्यातल्या विसर्जन सोहळ्याचं पुराण सुरू होतं. गणपती विसर्जनाचा थाट म्हणजे काय ते पाहायचं असेल तर पुण्यातच यायला हवं, असं एका वाहिनीवरील युवा पत्रकार दिवसभर सांगत होती.
त्याच मुलीची फेसबुकवर पडलेली पोस्ट..
- ‘ढोल ताशे, बँड, रांगोळीच्या पायघडय़ा आणि त्यावरून जाणारा लाडका गणपती बाप्पा.. सगळ्यांनी हमखास बघावा आणि दाखवावा असा, असं मी दिवसभर सांगत होते. पण बुधवारी सकाळी विसर्जनाचा सोहळा लाइव्ह करण्यासाठी अलका चौकात उभी होते.. तर स्पीकरच्या भिंतींमधून हजारो बेभान तरुण मुलांच्या रिमिक्स डान्समधून वाट काढणारा गणपती पाहताना भडभडून आलं.. या बिचा-या गोजिरवाण्या गणपतीचे कान किटवूनच त्याला परत पाठवायचं ठरवलं होतं की काय कुणास ठाऊक? एवढं सगळं सोसून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतो म्हणजे बाप्पाचं मन पण खूपच मोठं असलं पाहिजे..’
०००००
पुण्यात यंदा या स्पीकरच्या गोंगाटामुळे थोडा वाद झाला म्हणतात. मिरवणुकीच्या बदलत्या स्वरूपाला काहींनी आक्षेप घेतला. मुंबईत मात्र एकमत आहे. फुल टू धमाल करायची याबद्दल. डीजे लावून, वाट्टेल ती गाणी कितीही वेळ वाजवून, धांगडधिंगा करून दररोज आवाजी प्रदूषणाचा विक्रम नव्याने प्रस्थापित करायचा याविषयी बहुतेक सगळ्याच मंडळांची ठाम एकी आहे. जे अल्पमतात ते मंडपाबाहेर.. बसा म्हणावं घरात..
०००००००००
स्थळ – ठाणे पूर्व. कोपरी अष्टविनायक चौकातील विसर्जन घाट..
चौक संपूर्ण गर्दीने फुललेला.. आकाशात रोषणाईच्या फटाक्यांमधून सप्तरंगी प्रकाशफुलांची उधळण. मुलींची लेझीम, बँडपथकांचं तालबद्ध संगीत. विसर्जन घाटावर निर्माल्य कलश. स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून येणारे भाविक, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस आणि इतर यंत्रणांचे कर्मचारी यांना नाश्ता, जेवण याची व्यवस्था. दृष्ट लागेल असं कोपरीच्या घाटावरील व्यवस्थापन पाहून चौकाकडे वळलो तर हात कानावर गेले.
नेहमीच एकमेकांशी स्पर्धा करणा-या मनसे आणि शिवसेनेने शेजारी-शेजारी उभारलेल्या मंचावरून गणेशभक्तांना शुभेच्छा देण्याचा कानठळी गोंगाट भल्याथोरल्या स्पीकरची दहीहंडी रचून सुरू ठेवला होता. ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादांचं उल्लंघन करून बोंबलणं सुरू होतं. लाज, खंत, खेद सारं सारं मनात अनिवार झाले..
०००००
‘व्हॉट्स अ‍ॅप’वर एक विनोद फिरतोय..
विसर्जन झालं आणि गणपती कैलास पर्वतावर घरी पोहोचले.. पार्वती मातेने मायेने विचारलं, काय कशी झाली ट्रीप.. पृथ्वीवर दहा दिवस धमाल केली ना, मोदक लाडू जोरात ना.
बाप्पा बोलले – मुझपे एक एहसान करना, की मुझपे कुछ भी एहसान न करना.
पार्वती – अरे हे काय बोलतो आहेस??
गणपती – लुंगी डान्स लुंगी डान्स..
रिद्धी-सिद्धी – देवा, अरे काय हे???
गणपती – १२ महिनेमे १२ तरीकेसे
ढिंका चिका ढिंका चिका रे एएए
महादेव – आईशप्पथ.. हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राहिली..
००००००००
याला विनोद कशाला म्हणायचं, हे भीषण वास्तव आहे. महादेवा, काय चुकलं रे बाप्पांचं? पृथ्वीवर दिवसरात्र हीच गाणी, हाच धिंगाणा ऐकलाय त्यांनी. आणखी काही दिवस तरी हाच इफेक्ट राहील त्यांच्यावर.
गणपतीबाप्पांचे हात मोदकलाडू, परशू, आशीर्वाद देण्यात गुंतलेले असतात म्हणून बरे, नाही तर बाप्पांनी या गाण्यांपासून सुटका मिळावी म्हणून खचितच त्यांचे कान या हातांनी झाकून घेतले असते.
त्याचं मन खूपच मोठं आहे.. म्हणूनच तो ही सगळी थेरं खपवून घेतो.. ठाकूरद्वारला मिरवणूकीत तृतीयपथीयांच्या जोडीने बिभत्स हावभाव करत नाचणारी उन्मादी टोळकी, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन् तास ताटकळणा-या महिलांच्या अंगचटीला जाणा-या, भाविकांची मानगूट पकडून त्यांना हिसडणा-या मुजोर कार्यकर्त्यांचं त्यामुळेच तर फावतं.
पर्यावरणाची नासाडी, तलावांची, खाडय़ांची, समुद्राची, जलचर सृष्टीची वाताहात दरवर्षी नित्यनेमाने होत राहते आणि तरीही बाप्पा सगळे अपराध पोटात घालतात.. आज नाही उद्या, पुढच्या वर्षी तरी माणूस नावाचा प्राणी सुधारेल अशी त्याला आशा आहे.
आपल्या परीने पर्यावरणाचा तोल सांभाळू पाहणा-या, शाडू मातीची मूर्ती आणणा-या, ध्वनिप्रदूषणाला हातभार न लावणा-या, घरच्या घरी पाण्याच्या टाकीत विसर्जन करण्याचा आगळा पायंडा पाडणा-या अल्पमतातील काहीशेंनाही तीच आशा आहे देवा!